Homeताज्या बातम्या

नेकनूरमधील दर्गा कॉलनीसह विविध वसाहतींच्या मूलभूत सुविधांसाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

बीड: नेकनूर शहरातील दर्गा कॉलनी, शाहबाज कॉलनी, सय्यद नगर, इस्लामपूर शिक्षक कॉलनी, इसाक नगर तसेच परिसरातील इतर वसाहतींमध्ये रस्त्यांची दयनीय

व्यवस्थापन कोट्याच्या नावाखाली कोट्यवधींचा खेळ? उच्च शिक्षण विभागाचा दणका; शिक्षण सम्राटांच्या अडचणी वाढल्या
आदिवासी भागात पाणी पुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रशासनाला निर्देश
कोकणगाव तुळजाभवानी मंदिरासाठी २० लाखांचा निधी; माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आ. सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नांना यश

बीड: नेकनूर शहरातील दर्गा कॉलनी, शाहबाज कॉलनी, सय्यद नगर, इस्लामपूर शिक्षक कॉलनी, इसाक नगर तसेच परिसरातील इतर वसाहतींमध्ये रस्त्यांची दयनीय अवस्था, चिखल, दुर्गंधीयुक्त घाण, कचर्‍याचे ढिग, नाल्यांची दुरवस्था आणि अपुर्‍या नागरी सुविधांमुळे नागरिकांचे हाल होत असल्याने जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे तातडीच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

शेख सद्दाम शेख सकलेन, मतीन खतीब आणि सय्यद साजेद अली उस्मान अली यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, संबंधित भागातील मुख्य व अंतर्गत रस्ते पूर्णपणे चिखलमय झाले असून वाहनांच्या चाकांमुळे खोल खाचा पडल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून पायी चालणारे नागरिक, दुचाकीस्वार, चारचाकी चालक, वृद्ध आणि लहान मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर बनत असून अपघाताचा धोका वाढला आहे.

तसेच परिसरात कचर्‍याचे ढिग साचल्याने दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाल्यांची दुरवस्था आणि पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने रस्त्यावर पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने सिमेंट अथवा मुरूम रस्ते करणे, नाल्यांची दुरुस्ती व नियमित साफसफाई, नियमित कचरा उचल व्यवस्था सुरू करणे, स्ट्रीटलाइट्स बसविणे आणि पावसाच्या पाण्याच्या निचरा व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

या गंभीर समस्यांमुळे हजारो नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगत, स्वच्छ भारत अभियानाच्या उद्दिष्टांनुसार आणि पायाभूत सुविधांचा विकास लक्षात घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) तसेच ग्रामसेवक, ग्रामपंचायत नेकनूर यांनाही देण्यात आल्या आहेत.

COMMENTS