पुणे : गुन्ह्यांचा तपास अधिक अचूक आणि प्रभावी करण्यासाठी पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक स

पुणे : गुन्ह्यांचा तपास अधिक अचूक आणि प्रभावी करण्यासाठी पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी केले. उत्कृष्ट तपास करणाऱ्या पोलिसांना देण्यात येणारे पदक ही केवळ सन्मानाची बाब नसून, त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीची जाणीव करून देणारे प्रतीक आहे. या पदकामुळे पोलीस दलात नव्याने दाखल होणाऱ्या अधिकारी आणि अंमलदारांना उत्कृष्ट कामगिरीची प्रेरणा मिळेल, असेही दाते यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील पोलीस संशोधन केंद्रात केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट अन्वेषण पदकाचा वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. सन २०२३ आणि २०२४ या दोन वर्षांतील गुन्हे तपासातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील २२ पोलीस अधिकारी आणि अंमलदारांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते या पदकांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख सुनील रामानंद, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलीस महासंचालक सुहास वारके, दीपक पांडे आणि सुनील फुलारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी बोलताना दाते यांनी सांगितले की, राज्यातील २२ पोलीस अधिकारी व अंमलदारांना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या दक्षता पदकाने गौरविण्यात येणे ही संपूर्ण पोलीस दलासाठी अभिमानाची बाब आहे. गुन्ह्यांचा तपास करताना अधिकारी आणि अंमलदार ज्या पद्धतीने मेहनत घेतात, त्याची दखल अशा पुरस्कारांमधून घेतली जाते. त्यांच्या कामगिरीमुळे इतरांनाही अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबियांचा मोठा वाटा असतो. विशेषतः महिला अधिकारी आणि अंमलदार कुटुंबाची जबाबदारी सांभाळत पोलीस दलातील कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या योगदानाचेही कौतुक झाले पाहिजे, असे दाते यांनी नमूद केले.
४४ प्रस्तावांमधून २२ जणांची निवड
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख सुनील रामानंद यांनी पदकासाठी करण्यात आलेल्या निवड प्रक्रियेची माहिती दिली. सन २०२३ आणि २०२४ या कालावधीत गुन्हे तपासात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ४४ अधिकारी व अंमलदारांची नावे राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आली होती. त्यापैकी २२ जणांची उत्कृष्ट अन्वेषण पदकासाठी निवड करण्यात आली.

COMMENTS