Homeताज्या बातम्यासंपादकीय

गुजरात निकालाचा अन्वयार्थ

गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, या निकालात भाजपने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले. किंबहून यावेळच्या विजयाला अन

हलगर्जीपणा नको…
‘मविआ’ ची वज्रमूठ सेैल
शेतकर्‍यांप्रती सरकारचे उदासीन धोरण

गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, या निकालात भाजपने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले. किंबहून यावेळच्या विजयाला अनेक कंगोरे आहेत, ते समजून घेण्याची खरी गरज आहे. गेल्या 27 वर्षांपासून भाजपची गुजरात या राज्यावर सत्ता आहे. 27 वर्षांपासून सत्ता हातात असतांना अजून 5 वर्षांसाठी सत्ता मिळवणे तसे अवघड काम, मात्र भाजपने ते लिलया पेलले. विशेष म्हणजे या निवडणुकीत आम आदमी पक्षाने काँगे्रसची मते घेत, भाजपला बहुसंख्य मताने विजयी करण्यात महत्वाची भूमिका बजावली. 182 विधानसभा जागा असलेल्या या राज्यात भाजप 147 ते 150 जागा जिंकून निर्विवाद सत्ता मिळवतांना दिसून येतो. तर दुसरीकडे आप आणि काँगे्रसला 18-20 जागांच्या पुढे झेप घेता आली नाही. शिवाय काँग्रेसची मतांची टक्केवारी निम्याहून अधिक झाली आहे. गुजरातच्या इतिहासातील काँग्रेसचा हा सर्वात मोठा पराभव आणि भाजपचा सर्वात मोठा विजय असल्याचे एंकदरित आकडेवारी वरुन दिसून येत आहे.
गेल्या 2017 च्या निवडणुकीत काँगे्रसने जो जोर लावला होता, तो यंदा दिसला नाही. 2017 च्या निवडणुकीत काँगे्रसने केलेले सुक्ष्म नियोजन, पाटीदार समाजाचे आंदोलन यामुळे काँग्रेसने भाजपला नाकीनऊ आणले होते. त्यामुळे गेल्या निवडणुकीत काँगे्रसने 70 च्यावर जागा जिंकल्या होत्या. तर 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 49 टक्के मते मिळाली होती. आता या मतांच्या टक्केवारीत 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजे भाजपच्या मतांचा टक्का आता 54 टक्के झाला आहे. मागच्यावेळी भाजपचे 99 उमेदवार निवडून आले होते. यावेळी भाजप 154 जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे 27 वर्ष सत्तेत राहूनही भाजपला अँटी इन्कंबन्सीचा सामना करावा लागलेला नाही. उलट अपेक्षेपेक्षा मोठा विजय भाजपला मिळाला आहे. या निवडणुकीत आपला 13 टक्के मते मिळाली आहेत. आपचे सहा उमेदवार आघाडीवर आहे. याचा अर्थ पंजाबनंतर आता आपने गुजरातमध्येही चंचूप्रवेश केला आहे. 13 टक्के मते मिळणे आणि 6 जागांवर उमेदवार आघाडीवर असणे ही आपसाठी मोठी गोष्ट आहे. शिवाय या मतांच्या बेगमीमुळे आपचा राष्ट्रीय पक्ष बनण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. 2022 च्या निवडणुकीत काँगे्रसची जागा आम आदमी पक्ष घेऊन गुजरात राज्यात सर्वांधिक मते घेणारा दुसरा पक्ष ठरेल, असा सर्वांचा अंदाज होता. मात्र या राज्यात आप सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. गुजरात राज्यात आपने आक्रमक प्रचार करण्यात आघाडी घेतली होती, तरी देखील त्याचे मतात परिवर्तन करण्यात आप अपयशी ठरला आहे. आपने काँगे्रसची मते घेतल्यामुळे भाजपचा विजय सुकर झाल्याचे चित्र आहे. एकीकडे काँगे्रस भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने काँगे्रसला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करत असतांना, काँगे्रसने गुजरात राज्याच्या निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. काँगे्रस नेते राहुल गांधी प्रचाराला दोन दिवस बाकी असतांना शेवटच्या टप्प्यात प्रचार सभा घेत होते, तर दुसरीकडे काँगे्रस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे देखील शेवटच्या टप्प्यात प्रचाराला आल्याचे दिसून आले. कोणताही प्रमुख राजकीय पक्ष हा जिंकण्याच्या दृष्टीने मैदानात उतरत असतो. मात्र काँगे्रसची ती स्ट्रेटजी दिसून येत नाही. कोणताही आक्रमक प्रचार नाही, भाजपच्या गुजरात राज्यातील उणीवा, त्रुटी काँगेसला दाखवता आली नाही. याउलट भाजप 27 वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तेत असतांना, भाजपने सावध पावले टाकली. कारण निवडणुका जाहीर होण्यापूर्वी वातावरणाचा कानोसा घेतला असता, भाजप सत्तेवर येईल, असे स्पष्ट संकेत होते, मात्र भाजपच्या जागा घटतील, असा अंदाज व्यक्त होत होता. तसेच राज्यात आप दुसर्‍या क्रमांकांचा पक्ष म्हणून उदय होईल, असे चित्र देखील होते. मात्र भाजपने सावध चाली टाकत, निवडणुकीचा बिगुल वाजण्याच्या आधी काही दिवस, विविध प्रकल्पांचे लोकार्पण, महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला नेत, तिथे रोजगार निर्मितीचे प्रयत्न, यातून भाजपने आम्हीच या राज्यासाठी योग्य आहोत, हा संदेश दिला. त्यातून भाजपने आघाडी घेतल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे गुजरात राज्यातील मोरबी येथील झूलता पुल कोसळून अनेकांचा मृत्यू झाला. या मुद्दयावरून काँगे्रस, आप भाजपला चांगलेच घेरु शकले असते. मात्र निवडणुकीत हा मुद्दाच समोर आला नाही. विशेष म्हणजे काँगे्रस आणि आपसमोर अनेक मुद्दे असतांना, त्यांनी या मुद्दयाला हात घातलेच नाही. त्यामुळे कोणत्याही निवडणुकीत जर विरोधक सक्षम नसतील, तर सत्ताधार्‍यांचा विजय सोपा होतो, हेच या निवडणुकीतून दिसून येते. एकीकडे भाजपची दिल्ली महानगरपालिकेवर 15 वर्षांपासून असलेली सत्ता आपने संपुष्टात आणत आपली सत्ता प्रस्थापित केली. त्याचवेळी आपने गुजरातमध्ये कोणताही करिश्मा दाखवू शकली नाही. तर काँगे्रस गुजरातमध्ये पुन्हा बॅकफूटवर जातांना दिसून आली.  

COMMENTS