जकार्ता: इंडोनेशियात सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी निघालेल्या प्रवाशांवर काळाने भीषण घाला घातला आहे. जावा प्रांतातील सुराबाया येथून दक्षिण सुलावेसीच्
जकार्ता: इंडोनेशियात सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी निघालेल्या प्रवाशांवर काळाने भीषण घाला घातला आहे. जावा प्रांतातील सुराबाया येथून दक्षिण सुलावेसीच्या मकासरकडे जाणाऱ्या एका फेरी बोटीला मदुरा बेटाजवळ भर समुद्रात अचानक भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून ४१ प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, क्रू मेंबर्ससह एकूण २७१ प्रवासी या बोटीतून प्रवास करत होते. बोट जावाच्या उत्तर-पूर्व किनाऱ्याजवळ पोहोचली असताना अचानक आगीचे लोट उठू लागले. आग इतकी भडकली की काही वेळातच संपूर्ण बोटीला कचाट्यात घेतले. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरून किंकाळ्या आणि आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले. अनेक किलोमीटर अंतरावरून धुराचे प्रचंड लोट दिसत होते.
घटनेची माहिती मिळताच इंडोनेशियाच्या सर्च अँड रेस्क्यू एजन्सीने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. तातडीने तैनात करण्यात आलेल्या विविध जहाजांच्या मदतीने आतापर्यंत २२५ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून बेपत्ता असलेल्या ४१ जणांचा शोध समुद्रात वेगाने सुरू आहे. इंडोनेशियात अशा प्रकारच्या बोट दुर्घटनांची मालिका सुरूच असून, गेल्या वर्षीही उत्तर सुलावेसी प्रांताजवळ एका प्रवासी बोटीला आग लागून ४ जणांचा मृत्यू झाला होता.

COMMENTS