जालना : मराठा आरक्षण्याच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्रे आणि त्यासंदर्भातील जात वैधता प्रमाणपत्रे रद्द होत असल्याच्या मुद्द्यावरून

जालना : मराठा आरक्षण्याच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्रे आणि त्यासंदर्भातील जात वैधता प्रमाणपत्रे रद्द होत असल्याच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलनक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली. गुरुवारी पत्रकार परिषदेत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मराठा समाजाच्या हितविरोधात काम केल्याचा आरोप केला. तसेच या प्रश्नावर सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास आगामी निवडणुकांमध्ये राजकीय परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
मनोज जरांगे म्हणाले की, महायुती सरकारवर विश्वास ठेवून मराठा समाजाने मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला. मात्र आता त्याच समाजाच्या मुलांच्या भविष्याशी खेळ केला जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. काही नेत्यांच्या माध्यमातून मराठा समाजाविरोधात वातावरण तयार केले जात असून, हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव घेत, त्यांच्या पक्षातील काही नेत्यांच्या परिसरात मराठा समाजाविरोधात आंदोलने होत असल्याचा आरोप केला. तसेच, मराठा समाजाशी प्रामाणिकपणे वागले नाही, तर भविष्यात समाजाची भूमिका बदलू शकते, असा इशाराही त्यांनी दिला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणबी नोंदी रद्द करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर दबाव आणल्याचा आरोप जरांगे यांनी केला. या संदर्भात काही कागदपत्रे असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला. सरकारने या विषयात वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी लक्ष्य करत, मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत सरकारने संवेदनशील भूमिका घ्यावी, अन्यथा निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम दिसतील, असा इशारा दिला.
सरकारकडे तातडीच्या निर्णयाची मागणी: मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करावी, कुणबी प्रमाणपत्रे आणि जात वैधता प्रक्रियेबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करावा आणि पात्र लाभार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची खात्री सरकारने द्यावी, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.

COMMENTS