कडा : कडा शहरातील श्री अमोलक जैन संस्थेच्या रिसर्च सेंटर परिसरातील देवराई गार्डनमध्ये असलेल्या अनेक झाडांची महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून कोणतीही

कडा : कडा शहरातील श्री अमोलक जैन संस्थेच्या रिसर्च सेंटर परिसरातील देवराई गार्डनमध्ये असलेल्या अनेक झाडांची महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून कोणतीही पूर्वपरवानगी न घेता कत्तल करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
महावितरणच्या वीजवाहिन्यांच्या देखभालीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांनी देवराई गार्डनमधील अनेक हिरवीगार झाडे मोठ्या प्रमाणावर तोडली. मात्र, याबाबत संबंधित संस्थेची अथवा जबाबदार अधिकाऱ्यांची कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. देवराई गार्डन हे परिसरातील पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. येथे विविध प्रकारची झाडे व वनस्पतींचे संगोपन करण्यात आले आहे.
वाढते तापमान आणि पर्यावरणीय असंतुलन यामुळे वृक्षसंवर्धनाची गरज असताना अशा प्रकारे झाडांची तोड होणे चिंताजनक आहे. या सर्व प्रकरणाची वनविभागाने, महसूल प्रशासनाने आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर व कठोर कारवाई करावी, अशी मागणी श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष योगेशशेठ भंडारी यांनी केली आहे. तसेच तोडण्यात आलेल्या झाडांच्या बदल्यात नव्याने वृक्षारोपण करून त्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे.

COMMENTS