शेवगाव : शेवगाव शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले असून, शेवगाव नगर परिषदेच्या नूतन कार्यालयीन वास्तूचे उद्घाटन

शेवगाव : शेवगाव शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले असून, शेवगाव नगर परिषदेच्या नूतन कार्यालयीन वास्तूचे उद्घाटन व स्थलांतर सोहळा सोमवारी (दि. ३ ऑगस्ट) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मात्र, या कार्यक्रमाला सत्ताधारी गटातील तसेच प्रमुख राजकीय पक्षांतील बहुतेक नगरसेवकांची अनुपस्थिती राहिल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच शेवगावच्या राजकारणात अरुण पाटील लांडे व अरुण मुंढे एकत्र आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
नगर परिषद कार्यालयाच्या नूतन वास्तूचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सौ. विजया घाडगे, नगराध्यक्षा सौ. माया अरुण मुंढे, नगरसेवक-नगरसेविका, आजी-माजी नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, माजी सैनिक, नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यापूर्वी नगर परिषद कार्यालय शहराबाहेरील ठिकाणी कार्यरत असल्याने नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसाठी ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. आता शहराच्या मध्यवर्ती भागात नवीन कार्यालय सुरू झाल्यामुळे नागरिकांना नागरी सेवा अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर पद्धतीने मिळणार आहेत. या निर्णयाचे शहरवासीयांनी स्वागत केले असून, नवीन प्रशासकीय केंद्रामुळे शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, नगर परिषद प्रशासनाने आयोजित केलेल्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला सर्व नगरसेवक व नगरसेविकांची उपस्थिती अपेक्षित होती. मात्र, सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच भारतीय जनता पक्षातील अनेक नगरसेवकांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. नगरसेवकांच्या अनुपस्थितीबाबत नगराध्यक्षा सौ. माया मुंढे तसेच मुख्याधिकारी सौ. विजया घाडगे यांनी कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे या अनुपस्थितीमागील कारणांबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे.
दोन ‘अरुण’ एकत्र
शेवगावच्या राजकारणातील दोन प्रभावशाली दोन ‘अरुण’ एकत्र आल्याने शहरासह तालुक्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू असतानाच नगर परिषद कार्यक्रमातील नगरसेवकांची अनुपस्थिती ही भविष्यातील राजकीय घडामोडींची नांदी तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

COMMENTS