नांदेड : २७ वी व २८ वी अमरनाथ यात्रा तसेच १९ वी चारधाम यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याच्या निमित्ताने धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांच्या वतीने

नांदेड : २७ वी व २८ वी अमरनाथ यात्रा तसेच १९ वी चारधाम यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याच्या निमित्ताने धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांच्या वतीने सोमेश कॉलनी येथील स्वामी समर्थ मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसाद सोहळ्याला हजारो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सलग २८ व्या वर्षी आयोजित या धार्मिक व सामाजिक उपक्रमात अमरनाथ यात्रेतील अन्नदाते, विविध सेवाभावी उपक्रमांतील दानशूर नागरिक तसेच माध्यम प्रतिनिधींचा विशेष सन्मान करण्यात आला.
जयश्री व धर्मभूषण अॅड. दिलीपभाऊ ठाकूर, सौ. बीना व राजेशसिंह ठाकूर, गंगाधरराव मुंगल तसेच सौ. सलोना व विजयसिंह चौहान यांच्या पुढाकारातून या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी राजेशसिंह ठाकूर यांच्या हस्ते अभिषेक, तर जयश्री व दिलीप ठाकूर यांच्या हस्ते महाआरती करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी आमदार अमर राजुरकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, भाजप पदाधिकारी आणि पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला.
अमरनाथ यात्रेत सेवा देणाऱ्या अन्नदात्यांना एकमुखी रुद्राक्ष व मोत्याची माळ देऊन गौरविण्यात आले. तसेच ’भाऊचा माणुसकीचा फ्रिज’, ’लायन्सचा डबा’, ’क्षुधा शांती’, ’कृपाछत्र’ आणि ’मायेची ऊब’ या सामाजिक उपक्रमांत योगदान देणाऱ्या दानशूर नागरिकांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. अॅड. दिलीप ठाकूर यांनी आतापर्यंत तब्बल २७ वेळा अमरनाथ यात्रा, ३३ वेळा वैष्णोदेवी आणि ३१ वेळा सुवर्णमंदिर (अमृतसर) दर्शन घेतल्याबद्दल त्यांचा सपत्निक विशेष सत्कार करण्यात आला.
मुसळधार पावसाचा इशारा असतानाही भाविकांचा उत्साह कायम होता. शहरात अनेक ठिकाणी पाऊस सुरू असतानाही कार्यक्रम पार पडेपर्यंत पावसाने दिलेली उघडीप भाविकांसाठी दिलासादायक ठरली. या सोहळ्यात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

COMMENTS