Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युद्ध छायेतही ‘ग्रीन आशा’चे मुंबईत आगमन

मुंबई : जागतिक स्तरावर वाढलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारतासाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. ‘ग्रीन आशा’ नावाचे द्रवरूप पेट्रोलियम वायू वा

अफवांमुळे उसळलेली गर्दी ओसरली; राहात्यात इंधन व गॅस पुरवठा सुरळीत; ‘उज्वला’लाच्या वितरणात अडचणी
इंधन साठेबाजी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
मुंबई बंदरात अडकला शेतीमाल; कोट्यवधींचे नुकसान; सरकारच्या धोरणांवर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची टीका

मुंबई : जागतिक स्तरावर वाढलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारतासाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. ‘ग्रीन आशा’ नावाचे द्रवरूप पेट्रोलियम वायू वाहून नेणारे भारतीय जहाज सुरक्षितपणे मुंबईतील जेएनपीए बंदरात गुरूवारी दाखल झाले. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्षानंतर या मार्गाने भारतात पोहोचलेले हे पहिले जहाज ठरल्याने या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अत्यंत संवेदनशील मानल्या जाणार्‍या हॉर्मुझ सामुद्रधुनीतून मार्गक्रमण करत हे जहाज भारतात पोहोचले. या परिसरात तणावपूर्ण परिस्थिती असल्याने जहाजांच्या हालचालींवर मोठी मर्यादा येत असताना ‘ग्रीन आशा’ने हा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. यामुळे भारतीय सागरी व्यवस्थेची क्षमता आणि नियोजन कौशल्य अधोरेखित झाले आहे. या जहाजामध्ये सुमारे 15 हजार 400 टन द्रवरूप पेट्रोलियम वायू होता. जेएनपीएच्या द्रव साठा केंद्रावर जहाज सुरक्षितरीत्या दाखल झाले असून या केंद्राचे संचालन भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या कंपन्यांच्या संयुक्त व्यवस्थापनाखाली चालते. या मोठ्या साठ्यामुळे देशातील इंधन पुरवठा अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. प्रवासादरम्यान जहाज, माल आणि कर्मचारी सर्वजण सुरक्षित राहिल्याची माहिती संबंधित यंत्रणांनी दिली आहे. तणावपूर्ण परिस्थितीतही मोहिम यशस्वीपणे पूर्ण झाल्याने सागरी सुरक्षेच्या दृष्टीनेही ही घटना महत्त्वाची मानली जात आहे. या यशस्वी आगमनामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेबाबत सकारात्मक संदेश गेला आहे. आंतरराष्ट्रीय तणाव वाढत असतानाही आवश्यक इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची देशाची क्षमता पुन्हा अधोरेखित झाली आहे. ‘ग्रीन आशा’चे आगमन हे केवळ एक जहाज आगमन नसून, भारताच्या सागरी सामर्थ्याचे आणि सक्षम पुरवठा व्यवस्थेचे प्रतीक ठरले आहे.

अडकलेल्या 16 जहाजांसाठी भारताचा इराणशी संपर्क
युद्धविरामानंतर भारताने तातडीने इराणशी संपर्क साधत अडकलेल्या 16 जहाजांच्या सुटकेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीच्या पश्‍चिम भागात थांबलेल्या भारताच्या तेल व वायू वाहतूक जहाजांना सुरक्षितपणे बाहेर काढून स्वदेशात आणण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. युद्धविरामामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेबाबत निर्माण झालेली चिंता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. सध्या एकूण 16 भारतीय जहाजे त्या परिसरात अडकलेली असून त्यापैकी बहुतांश जहाजे तेल आणि वायू वाहतुकीशी संबंधित आहेत. या जहाजांमध्ये सुमारे दोन लाख टनांहून अधिक द्रवरूप पेट्रोलियम वायूचा साठा असल्याचे सांगितले जाते, जो देशासाठी अत्यावश्यक मानला जातो. ही जहाजे सुरक्षितपणे मार्गस्थ करण्यासाठी भारत सरकार इराणशी सातत्याने संपर्क ठेवून आहे.

COMMENTS