चासनळी - चासनळी-वडगाव येथील अजित कांगणे यांच्या कुटुंबातील महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन-अडीच तोळ्यांची पोत चासनळी येथील माऊली कृषी उद्योग या दुक

चासनळी – चासनळी-वडगाव येथील अजित कांगणे यांच्या कुटुंबातील महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन-अडीच तोळ्यांची पोत चासनळी येथील माऊली कृषी उद्योग या दुकानात हरवली होती. दोन-तीन दिवस शोध घेऊनही पोत सापडत नसताना दुकानाच्या काउंटरखाली ती आढळून आली. माऊली कृषी उद्योगचे संचालक सागर कोकाटे व त्यांचे बंधू विश्वकिरण कोकाटे यांनी खात्री करून ही पोत कांगणे यांना परत केली. कांगणे यांच्या कुटुंबातील महिला चासनळी येथील माऊली कृषी उद्योग या दुकानात गेल्या असताना त्यांच्या गळ्यातील पोत हरवली होती. त्यांनी परिसरात तसेच दुकानातही तिचा शोध घेतला, मात्र पोत सापडली नाही. यानंतर कांगणे यांनी दुकानातही येऊन चौकशी केली होती. दरम्यान, माऊली कृषी उद्योगचे संचालक सागर कोकाटे यांचे बंधू विश्वकिरण कोकाटे हे धामोरी येथील कृषी सेवा केंद्रातून परतत असताना चासनळी येथील दुकानात थांबले. त्यावेळी काउंटरखाली सहज नजरेस न पडणाऱ्या ठिकाणी त्यांना पोत आढळून आली. दुकानातील सीसीटीव्ही बंद असल्याने पोत नेमकी कधी व कशी तेथे पडली, याचा खुलासा होऊ शकला नाही. मात्र, अजित कांगणे दुकानात येऊन गेल्याची माहिती कोकाटे बंधूंना मिळाली होती. त्यानंतर सागर कोकाटे व विश्वकिरण कोकाटे यांनी पोत कांगणे यांचीच असल्याची खात्री करून ती त्यांना परत केली. हरवलेली मौल्यवान पोत परत मिळाल्याने कांगणे कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी कोकाटे बंधूंचे आभार मानले. हरवलेली मौल्यवान वस्तू प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल सागर व विश्वकिरण कोकाटे यांच्या प्रामाणिकपणाचे परिसरातून कौतुक होत आहे.

COMMENTS