बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत – भाजप नेते रवींद्र चव्हाण मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श
बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत – भाजप नेते रवींद्र चव्हाण
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीने आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली असून, पक्षविरोधी भूमिका घेत स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या इच्छुकांनी माघार घ्यावी, असे आवाहन महायुतीचे नेते रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
आगामी १८ जून रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकांसह नागपूर येथील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील प्रमुख पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रातील नेतृत्व तसेच राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर जागावाटपाचा अंतिम निर्णय घेण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
चव्हाण यांनी नमूद केले की, १ जून रोजी अधिकृत उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून ४ जून ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण तोडगा काढून अतिरिक्त उमेदवारांचे अर्ज मागे घेतले जातील. निवडणुका सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडाव्यात आणि महायुतीचे सर्व उमेदवार विजयी व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात अर्ज भरलेल्या इच्छुकांनी संघटनात्मक हित लक्षात घेऊन माघार घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली.
आज उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्याचप्रमाणे महायुती आणि महाविकास आघाडीतून अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. आज गुरुवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत असून, ती संपल्यानंतरच या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
सोलापुरात ‘मविआ’चा मुख्य उमेदवारच बाद सोलापूरमध्ये महायुतीने राजेंद्र राऊत यांना मैदानात उतरवले आहे, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर रिंगणात होते. मात्र, अर्ज छाननीच्या प्रक्रियेत फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद ठरला आहे. यामुळे ‘मविआ’ला मोठा धक्का बसला असून आता त्यांना इतर कोणालातरी पाठिंबा द्यावा लागणार आहे.
महायुतीचे अधिकृत १७ उमेदवार:
- नागपूर : डॉ. राजीव भास्करराव पोतदार
- भंडारा-गोंदिया : अविनाश आनंदराव ब्राम्हणकर
- वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : अरुण हनुमंत लखाणी
- अमरावती : प्रवीण रामचंद्र पोटे
- सोलापूर : राजेंद्र विठ्ठल राऊत
- अहिल्यानगर : प्राजक्त प्रसादराव तनपुरे
- जळगाव : नंदकिशोर भागवत महाजन
- सांगली-सातारा : धैर्यशील ज्ञानदेव कदम
- नांदेड : अमरनाथ अनंतराव राजूरकर
- उस्मानाबाद-लातूर-बीड : बसवराज माधवराव पाटील
- छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)-जालना : सुहास त्र्यंबकराव शिरसाट
- ठाणे : रवींद्र सदानंद फाटक
- यवतमाळ : दुष्यंत सतीश चतुर्वेदी
- परभणी-हिंगोली : सईद शेरगुल खान
- नाशिक : नरेंद्र भिकाजी दराडे
- रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत सुनील तटकरे
- पुणे : विक्रम संजय काकडे

COMMENTS