मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या विसाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारव

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या विसाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारवर तसेच भाजपच्या विविध मुद्द्यांवरून कडक शब्दांत टीका केली. विद्यार्थ्यांचे प्रश्न, वाढती बेरोजगारी, शिक्षणव्यवस्थेतील त्रुटी, समाजमाध्यमांवरील अपप्रवृत्ती, राजकीय वातावरण आणि काही मंत्र्यांच्या विधानांवर त्यांनी आपली प्रखर भूमिका मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांच्या भाषेच्या वापराबाबत केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करत त्यांनी सत्ताधाऱ्यांनाच आधी आत्मपरीक्षण करण्याचा मोलाचा सल्ला दिला.
पंतप्रधानांनी अलीकडेच एका दृकश्राव्य संदेशात काही तरुणांनी वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबाबत चिंता व्यक्त करत त्यांना माफ करण्याची भूमिका मांडली होती. यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले की, “कोणाविषयीही अश्लाघ्य किंवा खालच्या पातळीची भाषा वापरणे अयोग्यच आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांत विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी समाजमाध्यमांवर जाणीवपूर्वक अपप्रचार आणि अवमानकारक भाषा वापरण्याची संस्कृती रुजवण्यात आली. ही प्रवृत्ती रोखण्याची जबाबदारीही सत्ताधाऱ्यांनी स्वीकारली पाहिजे.” यावेळी त्यांनी, “दुसऱ्यांनाही आया असतात. त्यामुळे आधी आपल्या पक्षातील समाजमाध्यमीय टोळीला मर्यादा पाळायला सांगा,” असा थेट टोला लगावला. तसेच विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनांवरील पोलिस कारवाईबाबतही त्यांनी सरकारला धारेवर धरले.
विद्यार्थ्यांमधील असंतोषाचा संदर्भ देताना राज ठाकरे म्हणाले की, वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या प्रश्नपत्रिका गळतीचे प्रकरण हे केवळ एक निमित्त आहे. वास्तविक तरुणांमध्ये वाढती बेरोजगारी, संधींचा अभाव, शिक्षणातील अनिश्चितता आणि भविष्याबाबतची असुरक्षितता यामुळे व्यापक नाराजी निर्माण झाली आहे. त्यांच्या मते, खेळण्यासाठी मैदाने नाहीत, गुणवत्तापूर्ण रोजगार उपलब्ध नाहीत, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे खाजगीकरण वाढत आहे आणि राजकारणात केवळ निवडणुका, पक्षांतर व सत्ता समीकरणांनाच महत्त्व दिले जात आहे. या वातावरणामुळे तरुणांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
नव्या पिढीबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आजची तरुणाई केवळ महानगरांपुरती मर्यादित नाही. १९९७ नंतर जन्मलेली पिढी राज्याच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर आहे. बदलत्या तंत्रज्ञानासोबत त्यांच्या अपेक्षाही बदलल्या आहेत. त्यामुळे जुन्या चौकटीत विचार करण्याऐवजी त्यांच्या आकांक्षा, अडचणी आणि मानसिकता समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर उपरोधिक टीका
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्याचा उल्लेख करत राज ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार उपरोधिक टीका केली. “लहानपणी बुद्धी तल्लख व्हावी म्हणून डोक्याला तेल लावण्याचा सल्ला दिला जातो; मात्र काही जणांनी आयुष्यभर तेल लावूनही बुद्धीचा विकास झालेला दिसत नाही,” असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. तसेच, दगडावरील ठसे आधारशी जोडण्याच्या वक्तव्यावर भाष्य करत त्यांनी अशा प्रकारची विधान करणाऱ्यांच्या विचारक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित के

COMMENTS