तामसा : खरीप हंगाम 2026 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना हदगाव तालुक्यातील तामसा, लोह, मांडवा, वानवाडी, माळेगाव, कोंडूर, खरटवाडी, पिंपराळा,

तामसा : खरीप हंगाम 2026 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना हदगाव तालुक्यातील तामसा, लोह, मांडवा, वानवाडी, माळेगाव, कोंडूर, खरटवाडी, पिंपराळा, दिग्रस आदी गावांतील शेतकरी अद्यापही मागील वर्षी मंजूर झालेल्या पिकविमा रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. विमा कंपनी व प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शेकडो शेतकरी हक्काच्या मदतीपासून वंचित राहिल्याची भावना व्यक्त करत असून प्रशासनावरील विश्वास उडत चालल्याचे चित्र दिसून येत आहे.
खरीप हंगाम 2025 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर संबंधित शेतकर्यांनी पिकविम्यासाठी दावे दाखल केले. अनेक शेतकर्यांचे प्रस्ताव मंजूर झाल्याचे सांगण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात त्यांच्या बँक खात्यात अद्याप एकही रुपया जमा झालेला नाही. त्यामुळे मंजुरीच्या कागदोपत्री प्रक्रिये आणि प्रत्यक्ष मदतीमध्ये मोठी दरी निर्माण झाल्याची नाराजी शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान, आगामी खरीप हंगामासाठी बियाणे, खते, औषधे व मशागतीचा खर्च वाढला असून मंजूर विमा रक्कम न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेकांना पेरणीची तयारी करण्यासाठी खाजगी सावकारांकडून किंवा अन्य मार्गाने कर्ज घ्यावे लागत असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, विमा कंपनीकडून किती दावे मंजूर झाले, किती रक्कम वितरित करण्यात आली आणि किती प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही स्पष्ट उत्तरे मिळत नसल्याने संपूर्ण प्रक्रियेबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS