चंदीगड : पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा यांच्या दिल्ली आणि चंदीगडमधील विविध ठिकाणांवर शनिवारी पहाटेपासून अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने व्या

चंदीगड : पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा यांच्या दिल्ली आणि चंदीगडमधील विविध ठिकाणांवर शनिवारी पहाटेपासून अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने व्यापक छापेमारी सुरू केली. त्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे.
गेल्या काही महिन्यांत त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर झालेली ही तिसरी कारवाई असल्याने पंजाबच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या या कारवाईमुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिकार्यांच्या पथकांनी एकाचवेळी चंदीगडमधील अधिकृत निवासस्थान, कार्यालय तसेच दिल्लीतील काही व्यावसायिक ठिकाणांची तपासणी केली. याशिवाय हॅम्पटन स्काय रिअॅल्टी लिमिटेडशी संबंधित परिसरांचीदेखील झडती घेण्यात आली. सकाळी मोठ्या संख्येने अधिकारी वाहनांसह पोहोचल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तपासादरम्यान विविध आर्थिक कागदपत्रे, संगणकीय माहिती, मोबाईल नोंदी आणि व्यवहारांशी संबंधित पुरावे तपासण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यातही ईडीने अरोरा यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. त्या वेळी परकीय चलन नियमांच्या कथित उल्लंघनासंबंधी तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. आता पुन्हा झालेल्या कारवाईमुळे तपास अधिक व्यापक स्वरूपात सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, काही व्यावसायिक कंपन्यांच्या माध्यमातून शंभर कोटी रुपयांहून अधिक आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मोबाईल फोन खरेदी-विक्री आणि निर्यात व्यवहारांमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याचा आरोप तपासात पुढे आला आहे. काही व्यवहारांमध्ये वस्तूंची खोटी खरेदी दाखवून त्यांची निर्यात करण्यात आल्याचेही तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. याशिवाय परदेशातून अवैध पैसा भारतात परत आणण्यासाठी संशयास्पद आर्थिक साखळी वापरण्यात आल्याचा संशय तपास अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. या प्रक्रियेत काही बनावट कंपन्यांचा वापर करून कर सवलतींचा गैरफायदा घेतल्याचेही तपासात समोर येत आहे.
राजकीय सूड भावनेतून कारवाई : मुख्यमंत्री मान

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया देताना, वारंवार छापेमारी करूनही अद्याप ठोस पुरावे समोर आले नसल्याचा दावा केला. पंजाब ही शूरवीरांची भूमी असून कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS