कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसर्या टप्प्यातील मतदान जवळ येत असतानाच अंमलबजावणी संचालनालयाने आपली कारवाई तीव्र केली आहे. रविवारी पहाटेपासून कोल

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसर्या टप्प्यातील मतदान जवळ येत असतानाच अंमलबजावणी संचालनालयाने आपली कारवाई तीव्र केली आहे. रविवारी पहाटेपासून कोलकाता शहरातील विविध भागांत छापेमारी करत ईडीने आर्थिक व्यवहारांच्या तपासाला वेग दिला. आनंदपूर आणि अलीपूर या भागांतील दोन प्रमुख व्यावसायिकांच्या निवासस्थानांसह कार्यालयांवर एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या.
सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीची पथके सुरक्षा दलांच्या मदतीने सकाळी लवकर आनंदपूर येथील व्यावसायिक कल्याण शुक्ला आणि अलीपूर येथील संजय कानोरिया यांच्या ठिकाणी पोहोचली. दोन्ही ठिकाणी कागदपत्रे, आर्थिक नोंदी आणि डिजिटल पुरावे यांची सखोल तपासणी सुरू असून, व्यवहारांची साखळी उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही कारवाई कथित ‘सोनू पप्पू’ प्रकरणाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात अलीकडेच अटक करण्यात आलेल्या व्यावसायिक जय कामदार यांचा महत्त्वाचा दुवा समोर आला आहे. तपासादरम्यान त्यांच्या मोबाईलमधून मिळालेल्या संदेशांमुळे अनेक संशयास्पद आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे उघड झाल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे, या डिजिटल संवादांमध्ये कल्याण शुक्ला आणि संजय कानोरिया यांची नावे आढळल्यानंतर ईडीने तातडीने कारवाई करत छापेमारीचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत तपासाचा विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS