नांदेड : राज्यभर गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याची छाया आता नांदेड जिल्ह्यावरही पडू लागल्याचे संकेत मिळत आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण

नांदेड : राज्यभर गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याची छाया आता नांदेड जिल्ह्यावरही पडू लागल्याचे संकेत मिळत आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत शालार्थ आयडी प्राप्त केलेल्या तब्बल 149 शिक्षकांच्या नियुक्ती प्रक्रियेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून, संबंधित शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेच्या मूळ संचिका तपासणीसाठी मागविण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील शिक्षण विभागात काही महिन्यांपूर्वी उघडकीस आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या शालार्थ घोटाळ्यामुळे शासन यंत्रणा सतर्क झाली आहे. या प्रकरणात अपात्र उमेदवारांना शिक्षक म्हणून नियुक्त करून त्यांना शालार्थ आयडी देण्यात आले आणि 2012 पासून शासनाच्या तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा टाकत पगार उचलण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ऑगस्ट 2025 मध्ये पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय विशेष तपास पथक (डखढ) स्थापन केले. या पथकाने राज्यातील विविध विभागांमध्ये चौकशीचा विस्तार करत अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. काही ठिकाणी वरिष्ठ शिक्षणाधिकार्यांनाही अटक करण्यात आली असून, या प्रकरणाची व्याप्ती राज्यभर पसरल्याचे संकेत मिळाले आहेत. दरम्यान, या विशेष पथकाने अलीकडेच लातूर विभागात तपासणी मोहीम राबवली होती. याच दरम्यान नांदेड जिल्ह्यातील शालार्थ आयडी संदर्भात व्ही.एम. भोसले यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत सहायक शिक्षण संचालक, लातूर यांनी नांदेड जिल्ह्यातील संबंधित 149 शिक्षकांची माहिती मागवली आहे. विशेष म्हणजे, या शिक्षकांची नियुक्ती ज्या संस्थांमध्ये झाली आहे, त्या संस्थांमध्ये काही प्रभावशाली राजकीय नेत्यांच्या शाळांचाही समावेश असल्याची चर्चा आहे. या संपूर्ण प्रक्रियेत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सहायक शिक्षण संचालक संजय पंचगल्ले यांनी तपासासाठी आवश्यक असलेल्या मूळ संचिकांची यादी नांदेडचे माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांना पाठवली असताना, याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे सलगर यांनी सांगितल्याचे समजते. त्यामुळे प्रशासनातील समन्वयाचा अभाव की जाणीवपूर्वक दुर्लक्ष, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकवण्यासाठी ही चौकशी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. जर या प्रकरणात गैरव्यवहार सिद्ध झाला, तर संबंधितांवर कडक कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे केवळ दोषींवर कारवाई होणार नाही, तर भविष्यात अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या चौकशीकडे जिल्ह्यातील शिक्षक, संस्था चालक आणि पालक वर्गाचे लक्ष लागून आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS