गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था दूर करण्यासाठी 12 कोटी 73 लाख 50 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सामाजिक क

गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था दूर करण्यासाठी 12 कोटी 73 लाख 50 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
गेवराई तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 327 शाळा असून, त्यापैकी 6 इमारतविरहित शाळांसाठी 11 नवीन वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. तसेच 46 शाळांमधील 67 वर्गखोल्या मोडकळीस आल्याने त्यांचे नव्याने बांधकाम करणे गरजेचे आहे. यासाठी 11 कोटी 16 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय विद्यार्थी संख्या वाढलेल्या 9 शाळांमध्ये 15 अतिरिक्त वर्गखोल्या बांधकामाची गरज असून, 35 वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी 57 लाख 50 हजार रुपयांचा निधी आवश्यक आहे. त्यामुळे एकूण 12 कोटी 73 लाख 50 हजार रुपयांची तरतूद जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या निधीतून करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित व दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी मोडकळीस आलेल्या इमारतींची तातडीने दुरुस्ती तसेच नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम करणे आवश्यक असल्याचे डॉ. गणेश ढवळे यांनी म्हटले आहे.

COMMENTS