धारूर : किल्ले धारूर नगरपरिषदेने अलीकडेच जाहीर केलेल्या विविध कर, शुल्क आणि सेवा दरवाढीला नागरिकांकडून तीव्र विरोध होत आहे. ही दरवाढ सर्वसामान्य

धारूर : किल्ले धारूर नगरपरिषदेने अलीकडेच जाहीर केलेल्या विविध कर, शुल्क आणि सेवा दरवाढीला नागरिकांकडून तीव्र विरोध होत आहे. ही दरवाढ सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता करण्यात आल्याचा आरोप घरमालक व नागरिकांनी केला आहे.
इंजिनियर सादिक बाबामिया इनामदार यांच्या नेतृत्वाखाली धारूर शहरातील मालमत्ता धारकांनी नगरपरिषदेकडे निवेदन सादर करून ही वाढीव व कथित बेकायदेशीर मालमत्ता कर आकारणी तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, नवीन कर आकारणी करताना संबंधित मालमत्ता धारकांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नाही, तसेच अनेक ठिकाणी स्वाक्षर्या घेतल्या नसतानाही कर लावण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. काही प्रकरणांमध्ये मालमत्ता मालकांची चुकीची नोंद करून कर आकारणी करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या नव्या कररचनेमुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडत असून, आधीच दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना करणार्या नागरिकांना आणखी अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नगरपरिषदेने पूर्वीपासून लागू असलेली कर आकारणी पद्धतच कायम ठेवावी, तसेच कोणतीही नवीन करवाढ तत्काळ थांबवावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण बैठक बोलावून संपूर्ण प्रक्रिया स्थगित करण्याची मागणीही करण्यात आली आहे. जर ही करवाढ रद्द करण्यात आली नाही, तर आमरण उपोषण करण्याचा इशाराही इंजिनियर सादिक इनामदार आणि मालमत्ता धारकांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे धारूर शहरात कर आकारणीबाबत असंतोष वाढत असून, नगरपरिषद पुढे कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS