नांदेड : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असताना, महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार कृष्णा आष्टीक
नांदेड : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असताना, महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार कृष्णा आष्टीकर यांनी राजकीय घडामोडींवर मोठे भाष्य केले आहे. “निवडणुकीत नगरसेवक पळवले जाण्याच्या चर्चा आणि आरोप पूर्णपणे वास्तव आहेत. मात्र, घोड्याला तलावापर्यंत नेता येते, पाणी प्यायचे की नाही हे घोडाच ठरवतो; त्याचप्रमाणे मतदार शेवटी स्वतःच्या इच्छेनेच गुप्त मतदान करणार आहेत,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. तसेच महाविकास आघाडी पूर्णपणे एकसंघ असून विरोधी महायुतीतच मोठी विसंगती असल्याचा दावा त्यांनी केला.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कृष्णा आष्टीकर यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, आपण ऐनवेळी मैदानात उतरलेले नसून, सर्वप्रथम अर्ज दाखल करून तयारी सुरू केली होती. महाविकास आघाडीने पुरस्कृत केले असले तरी आपण अपक्ष म्हणून सर्वपक्षीय मतदारांपर्यंत पोहोचत आहोत. मी स्थानिक, तरुण आणि २४ तास उपलब्ध राहणारा मराठी माणूस असल्याने मतदारांचा कौल माझ्याच बाजूने असेल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे रामदास पाटील सुमठाणकर यांच्या माघारीनंतरची खंत ही मानवी भावना असून, सुमठाणकर कुटुंब आणि काँग्रेस संघटना आपल्या पाठीशी ठाम असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
दुसरीकडे, महायुतीवर टीका करताना आष्टीकर म्हणाले की, महायुतीच्या प्रचारात दुसऱ्या पक्षांचे नेते एकत्र दिसत नाहीत, त्यांच्यात अंतर्गत गुप्त गणिते सुरू आहेत. याच वेळी काँग्रेसचे अमर राजूरकर यांच्या उमेदवारीवर अप्रत्यक्ष तोफ डागत ते म्हणाले की, दोन वेळा संधी दिल्यानंतर पुन्हा त्यांनाच का? ही परिषद कोणाची मक्तेदारी नाही. मतदारांसाठी त्यांनी काय केले, याचा विचार आता मतदार करतील. आष्टीकर यांच्या या थेट आणि आक्रमक विधानांमुळे नांदेडच्या स्थानिक राजकीय वर्तुळात आणि विधानपरिषद निवडणुकीच्या वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे.

COMMENTS