देवळाली प्रवरा : पाणी फाऊंडेशन फार्मर्स कप, राज्यातील चारही कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागाच्या सहभागातून सुरू असलेल्या शेती शाळेच्या माध्यमातून

देवळाली प्रवरा : पाणी फाऊंडेशन फार्मर्स कप, राज्यातील चारही कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागाच्या सहभागातून सुरू असलेल्या शेती शाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शास्त्रोक्त शेतीचे मार्गदर्शन केले जात आहे. याच उपक्रमांतर्गत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. चांगदेव वायळ यांनी मालेगाव तालुक्यातील देवरपाडा येथील सप्तशृंगी महिला शेतकरी गटाला प्रत्यक्ष भेट देऊन जैविक कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले.
शेती शाळेच्या माध्यमातून राज्यातील २६ पिकांवर लागवडीपासून काढणीपर्यंतचे मार्गदर्शन केले जाते. कृषी विद्यापीठांमधील शास्त्रज्ञ दर आठवड्याला ऑनलाइन पद्धतीने शेतकरी व शेतकरी गटांशी संवाद साधतात. मागील चार वर्षांपासून मूग, उडीद, तूर, मका आणि हरभरा या पिकांवरील किडींच्या नियंत्रणाबाबत डॉ. वायळ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
धुळे येथील काम आटोपून राहुरीकडे परतत असताना डॉ. वायळ यांनी देवरपाडा येथील सप्तशृंगी महिला शेतकरी गटाला अचानक सदिच्छा भेट दिली. विशेष म्हणजे, आदल्या दिवशी झालेल्या ऑनलाइन शेती शाळेत याच गटातील महिलांनी डॉ. वायळ यांना विविध प्रश्न विचारले होते. दुसऱ्याच दिवशी ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या भेटीला आल्याने महिला शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
डॉ. वायळ यांनी महिला शेतकऱ्यांना जैविक कीड नियंत्रणाच्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांनी शेतात तयार केलेले चिकट सापळे, कामगंध सापळे, पक्षी थांबे, दशपर्णी अर्क आणि निंबोळी अर्क यांची पाहणी केली. या उपाययोजनांचा पिकांमध्ये होणारा उपयोग आणि त्यातून मिळणारे परिणाम याबाबतही त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी पाणी फाऊंडेशन मालेगाव एसडीएओ पथकातील मन्मथ धुप्पे, वैष्णवी कासार, उमेद मेंटॉर सचिन पाटील, उमेद बीएमएम निलेश मानकर आणि उमेद सीसी कळमकर उपस्थित होते.

COMMENTS