नायगाव: तालुक्यातील नरसी जवळ असलेल्या खंडगाव येथे जमिनीवर पडलेल्या विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्

नायगाव: तालुक्यातील नरसी जवळ असलेल्या खंडगाव येथे जमिनीवर पडलेल्या विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून महावितरणच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अजय शंकर जेलेवाड (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. अजय सकाळी सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर गेला होता. रात्री झालेल्या पावसामुळे परिसर ओला होता. त्याच वेळी जमिनीवर पडलेल्या विद्युत तारेत वीजप्रवाह सुरू असल्यामुळे अजयला जोरदार विजेचा धक्का बसला आणि तो गंभीर जखमी झाला. ग्रामस्थांनी लाकडी काठीच्या सहाय्याने अजयला तारेपासून दूर करून तातडीने नायगाव येथील शासकीय रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अकाली मृत्यूमुळे जेलेवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जमिनीवर तार पडलेली असताना ती वेळेत दुरुस्त न केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच मृत तरुणाच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत व कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्यावी, अशी जोरदार मागणी खंडगावच्या ग्रामस्थांनी केली आहे.

COMMENTS