मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा यावरून सभागृहात तीव्र गदारोळ
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा यावरून सभागृहात तीव्र गदारोळ झाला. काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांना बिष्णोई गुन्हेगारी टोळीकडून पुन्हा धमकी मिळाल्याचा विषय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित करत सरकारकडे कठोर पावले उचलण्याची मागणी केली.
वडेट्टीवार यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधींना सातत्याने धमक्या मिळत असतील, तर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाने गांभीर्याने स्वीकारली पाहिजे. त्यांनी चित्रपट क्षेत्रातील काही व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते, तर जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणार्या आमदारांनाही आवश्यक ते संरक्षण मिळाले पाहिजे, असे स्पष्ट केले. साजिद पठाण यांना मिळालेल्या धमक्यांची सखोल चौकशी करून त्यांना तातडीने अतिरिक्त सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यावर सभापतींकडून लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेबाबत शासन आवश्यक ती उपाययोजना करेल आणि परिस्थितीनुसार संरक्षण वाढविण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. आमदारांची सुरक्षा आणि शेतकर्यांचे प्रश्न या दोन्ही विषयांवर शासनाने ठोस भूमिका जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.
शेतकरी आत्महत्यांवरून विरोधकांचा सभात्याग
लातूर जिल्ह्यात अधिवेशन सुरू असतानाच दोन शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याने विरोधकांनी हा विषय तातडीने सभागृहात चर्चेसाठी घ्यावा, अशी मागणी केली. वाढते कर्ज, उत्पादन खर्च, बाजारपेठेतील अनिश्चितता आणि आर्थिक अडचणी यामुळे शेतकरी वर्ग गंभीर संकटातून जात असल्याचे विरोधकांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावर स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, तो स्वीकारण्यात न आल्याने विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली. शेतकर्यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नावर तातडीने चर्चा होणे आवश्यक असताना सरकारकडून अपेक्षित संवेदनशीलता दिसून आली नाही, असा आरोप करत विरोधी आमदारांनी सभागृहातून सभात्याग केला.

COMMENTS