पंढरपूर : राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी तसेच 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने'तील अटी शिथिल करण्यात याव्यात, य
पंढरपूर : राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी तसेच ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’तील अटी शिथिल करण्यात याव्यात, या मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या उपोषणाचा रविवारी तिसरा दिवस होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या या आंदोलनाला राज्याच्या विविध भागांतून पाठिंबा मिळत असून, शेतकरी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे चित्र दिसून आले.
सततच्या उपोषणामुळे रोहित पवार यांच्या प्रकृतीवर परिणाम जाणवू लागल्याची माहिती वैद्यकीय तपासणीतून समोर आली आहे. त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण (शुगर लेव्हल) कमी झाल्याचे सांगण्यात आले असून, रक्तदाब मात्र नियंत्रणात असल्याचे वैद्यकीय पथकाने स्पष्ट केले.
आंदोलनस्थळी बोलताना रोहित पवार यांनी शासनावर कडक शब्दांत टीका करत, केवळ चर्चेच्या आश्वासनांवर विश्वास ठेवता येणार नसल्याचे म्हटले. कर्जमाफी योजनेतील जाचक अटी अधिकृतपणे मागे घेतल्या जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा आपल्याला घरातूनच मिळाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, शासनाकडून चर्चेचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत असली, तरी आंदोलनाबाबत अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.

COMMENTS