नांदेड : नसरापूर येथे एका अल्पवयीन चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, राज्यभरातून संतापाची तीव्र लाट

नांदेड : नसरापूर येथे एका अल्पवयीन चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, राज्यभरातून संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या क्रूर कृत्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ (महाराष्ट्र राज्य) आक्रमक झाला असून, आरोपींना तातडीने मृत्युदंडाची शिक्षा देण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे. सोमवार दि. 4 मे रोजी नांदेड येथे सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय समोर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे दिग्दर्शने आयोजित करण्यात आली आहेत अशी माहिती प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांनी दिली आहे.
अ.भा. ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत, ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून अशा नराधमांना समाजात जगण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांना लवकरात लवकर फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी कठोर भूमिका मांडली. त्यांनी यापूर्वी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता; मात्र राज्य शासनाने तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केल्याने पुढील न्यायप्रक्रियेवर लक्ष केंद्रित करण्याची भूमिका महासंघाने घेतली आहे. या प्रकरणी महासंघाने प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. यामध्ये खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून तातडीने निकाल देणे, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देणे आणि पीडित कुटुंबाला संपूर्ण संरक्षण व मदत उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे. अशा घटनांना आळा बसावा यासाठी कायद्याचा धाक निर्माण होणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे या घोषणेसह राज्यभर निषेध व्यक्त केला जात असून, नागरिकांमध्येही प्रचंड रोष आहे. या घटनेने समाजमन हादरले असून, आता सर्वांच्या नजरा न्यायालयीन प्रक्रियेवर खिळल्या आहेत. पीडितेला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार, असा निर्धार अ.भा. ब्राह्मण महासंघाने व्यक्त केला आहे.

COMMENTS