मुंबई : रू देशातील हवामानात सध्या मोठे चढ-उतार पाहायला मिळत असून काही भागांत वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तर दुस

मुंबई : रू देशातील हवामानात सध्या मोठे चढ-उतार पाहायला मिळत असून काही भागांत वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तर दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने 21 एप्रिलपर्यंतचा अंदाज जाहीर करत महाराष्ट्रासह तब्बल 13 राज्यांमध्ये उष्णतेचा फटका बसण्याचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकातील काही भागांत 19 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहू शकते. छत्तीसगड, तेलंगणा, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओडिशा येथे 19 एप्रिलदरम्यान तापमान वाढण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि रायलसीमा भागांत 18 एप्रिल रोजी उष्णतेची तीव्रता अधिक जाणवू शकते. वायव्य भारतावर सक्रिय झालेल्या पश्चिमी प्रणालीमुळे वातावरणात बदल होत असून 16 एप्रिलच्या रात्रीपासून पश्चिम हिमालयीन भागात आणखी एक कमकुवत प्रणाली सक्रिय होण्याची शक्यता आहे. यामुळे उत्तर, मध्य आणि पूर्व भारतातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची चिन्हे आहेत. मध्य, पश्चिम व दक्षिण भारतातील काही भागांत उष्णतेसोबत दमट हवामानही जाणवणार आहे. दरम्यान, ईशान्य भारतात वेगळीच परिस्थिती दिसून येत आहे. आसाम व मेघालयमध्ये 17 ते 19 एप्रिलदरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही अशीच परिस्थिती राहणार असून अरुणाचल प्रदेशात काही ठिकाणी विजांचा कडकडाट, गारपीट आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम भारतातही काही प्रमाणात हवामान बदलाचे संकेत असून मध्य महाराष्ट्रात 18 ते 21 एप्रिलदरम्यान हलक्या सरींसह मेघगर्जना होऊ शकते. या काळात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
विदर्भात उष्णतेचा कडाका; अकोल्यात सर्वाधिक तापमान
राज्यात विशेषतः विदर्भात उष्णतेची तीव्रता लक्षणीय वाढली आहे. अकोल्यातील तापमान 44 अंशांच्या पुढे गेले असून ते देशातीलच नव्हे तर जागतिक पातळीवरही सर्वाधिक तापलेल्या शहरांपैकी एक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सर्व विभागांची आपत्कालीन बैठक घेऊन उष्माघाताचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष सुरू करण्यात आले असून शासकीय व ग्रामीण रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 137 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच ओआरएस आणि आवश्यक औषधसाठा मुबलक ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात दवंडीच्या माध्यमातून जनजागृती करण्यावरही भर देण्यात येत आहे.
नागपूरमध्ये ‘कोल्ड वॉर्ड’ची तयारी
विदर्भातीलच नागपूर जिल्ह्यातही प्रशासन सतर्क झाले असून आरोग्य यंत्रणेला उच्च सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उष्माघाताच्या रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विशेष ‘कोल्ड वॉर्ड’ तयार करण्यात आला आहे. या विभागात तापमान नियंत्रणासाठी कुलर, वातानुकूलन यंत्रणा तसेच थंड पाण्याच्या उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक औषधसाठाही उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

COMMENTS