कोपरगाव : राज्यातील नद्यांचे वाढते प्रदूषण रोखून त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महायुती शासनाने महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन

कोपरगाव : राज्यातील नद्यांचे वाढते प्रदूषण रोखून त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महायुती शासनाने महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गोदावरी नदीचे संवर्धन होऊन पर्यावरण संरक्षणास चालना मिळणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
बुधवारी (दि. १) मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोपरगाव मतदारसंघातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या संवर्धनासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यास यश मिळाल्याने नदीच्या विकासकामांना गती मिळणार आहे.
पर्यटन विभागामार्फत २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या निधीतून गोदावरी नदीपात्रातील सुमारे दोन किलोमीटर परिसराची स्वच्छता व गाळ काढणे, प्रदूषण रोखण्यासाठी निर्माल्य घाट उभारणे, जॉगिंग ट्रॅक व पथरस्ते तयार करणे, ड्रेनेज डायव्हर्शन, स्टोन पिचिंग, रिटेनिंग व गॅबियन वॉल उभारणे, स्वच्छतागृहे बांधणे, वनीकरण व वृक्षारोपण करणे, कचरा कुंड्या व बाक बसविणे, नाल्यांची साफसफाई, प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन तसेच सोलर स्ट्रीट लाईट बसविणे अशी विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत.
पवित्र गोदावरी नदी ही कोपरगावकरांसाठी अनमोल देणगी असून या नदीकाठी पौराणिक, धार्मिक व ऐतिहासिक परंपरा लाभलेले कोपरगाव शहर व परिसरातील अनेक गावे वसलेली आहेत. त्यामुळे या नदीचे संवर्धन करणे अत्यावश्यक असल्याचेही आमदार काळे यांनी नमूद केले.
दरम्यान, नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नद्यांचे प्रदूषण नियंत्रण व पुनरुज्जीवनासाठी राज्य शासनाने उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन योजनेत गोदावरी नदीचा समावेश झाल्याबद्दल पर्यावरणप्रेमी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

COMMENTS