दिल्ली : राजधानी दिल्लीतून काळजाचा थरकाप उडवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. विवेक विहार परिसरात रविवारी पहाटे एका इमारतीला भीषण आग लागली. पहाटेच

दिल्ली : राजधानी दिल्लीतून काळजाचा थरकाप उडवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. विवेक विहार परिसरात रविवारी पहाटे एका इमारतीला भीषण आग लागली. पहाटेची वेळ असल्याने सर्वजण गाढ झोपेत होते आणि त्याच वेळी एसीचा स्फोट होऊन काळाने झडप घातली. या आगीत ९ निष्पाप जीवांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
ही भीषण आग पहाटे ३.४७ च्या सुमारास लागली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये अचानक एसीचा भीषण स्फोट झाला आणि पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा आणि विषारी धुराचे लोट इतके प्रचंड होते की, इमारतीतील रहिवाशांना बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग उरला नाही.
या दुर्घटनेत प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेला थरार अंगावर काटा आणणारा आहे. तिसऱ्या मजल्यावरील नागरिक जीव वाचवण्यासाठी गच्चीच्या दिशेने धावले, मात्र तिथेच घात झाला. गच्चीचा दरवाजा बाहेरून बंद असल्याने नागरिक तिथेच अडकले आणि धुरामुळे श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाला काही मृतदेह चक्क बेडवरच आढळले, यावरून त्या लोकांना सावरण्याची संधीही मिळाली नसल्याचे समोर येत आहे.
अग्निशमन दलाच्या १४ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत १२ पेक्षा जास्त लोकांचे प्राण वाचवले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी ४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतदेह इतक्या वाईट अवस्थेत जळाले आहेत की, ओळख पटवण्यासाठी आता डीएनए चाचणीचा आधार घ्यावा लागणार आहे.
सध्या परिसरात कुलिंग ऑपरेशन सुरू असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. एका छोट्या तांत्रिक बिघाडामुळे ९ जणांना आपला जीव गमवावा लागल्याने संपूर्ण दिल्लीवर शोककळा पसरली आहे.

COMMENTS