मुंबई : भोंदू म्हणून ओळखल्या जाणार्या तसेच लैगिंक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला अशोक खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केल

मुंबई : भोंदू म्हणून ओळखल्या जाणार्या तसेच लैगिंक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला अशोक खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या नव्या खुलाशांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विविध राजकीय नेते, त्यांचे सहकारी तसेच काही शासकीय अधिकारी यांचे खरातशी दूरध्वनीद्वारे संपर्क असल्याचा दावा दमानिया यांनी केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. दमानिया यांच्या मते, रूपाली चाकणकर यांनी खरातशी एकूण 177 वेळा दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असून, त्यातील 119 कॉल आलेले आणि 58 कॉल केलेले आहेत. या संभाषणाचा एकूण कालावधी सुमारे 33 हजार 727 सेकंद इतका असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे या संपर्कामागील कारणांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दमानिया यांनी सादर केलेल्या माहितीनुसार, खरातच्या संपर्क यादीत अनेक प्रभावी व्यक्तींची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, जयंत पाटील, दीपक केसरकर यांच्यासह अनेक नेते व त्यांच्या सहकार्यांचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे, रूपाली चाकणकर यांचे नाव या यादीत अग्रस्थानी असल्याचा दावा करण्यात आला आहे. दमानिया यांनी स्पष्ट केले की, त्यांनी जाहीर केलेल्या नावांचा अर्थ संबंधित व्यक्तींवर थेट आरोप असल्याचा नाही. काही जण उत्सुकतेपोटी किंवा इतरांच्या सांगण्यावरून खरातकडे गेले असतील; मात्र काही जणांनी वैयक्तिक फायद्यासाठी संपर्क साधला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे त्यांनी नमूद केले. या यादीत काही आमदार, त्यांच्या स्वीय सहाय्यकांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले. नाशिक परिसरातील काही लोकप्रतिनिधी, काही अधिकार्यांशी संबंधित व्यक्ती तसेच काही उद्योग क्षेत्रातील नावेही दमानिया यांनी वाचून दाखवली. जयंत पाटील यांचे नाव या यादीत आल्याचे वाचून वैयक्तिकरित्या दुःख झाल्याचेही त्यांनी नमूद केले. याशिवाय, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी स्तरावरील अधिकारी आणि औद्योगिक वसाहतीतील काही कर्मचार्यांचेही दूरध्वनी संपर्क आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.

COMMENTS