मिर्झापूर : उत्तरप्रदेश राज्यातील मिर्झापूर-रेवा महामार्गावर बुधवारी उशिरा रात्री भीषण अपघात होऊन 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव ट्रकने मा

मिर्झापूर : उत्तरप्रदेश राज्यातील मिर्झापूर-रेवा महामार्गावर बुधवारी उशिरा रात्री भीषण अपघात होऊन 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव ट्रकने मागून दिलेल्या जोरदार धडकेनंतर दोन कार एकमेकांवर आदळल्या आणि काही क्षणांतच त्यांना आग लागल्याने प्रवासी जिवंत जळाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
ड्रमंडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरका घुमन चौकाजवळ हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, पुढे जाणार्या ट्रेलरच्या मागे दोन कार प्रवास करत होत्या. त्याचवेळी हरभर्याने भरलेला एक ट्रक वेगात येत या दोन्ही कारवर आदळला. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की, कार पुढे जाऊन ट्रेलरवर आपटल्या आणि लगेचच पेट घेतला. या दुर्घटनेत बोलेरो कारमधील आठ जण आणि स्विफ्ट डिझायरमधील चालक यांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय ट्रकमधील क्लिनरचाही मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 11 वर पोहोचला आहे. आगीत दोन्ही कार पूर्णतः जळून खाक झाल्याने मृतांची ओळख पटवणे अवघड झाले आहे.
पोलीस अधीक्षक अपर्णा रजत कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी पवन कुमार गंगवार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरोमधील सर्व प्रवासी जिगना परिसरातील नरायना गावचे रहिवासी होते. ते मैहर येथे धार्मिक विधी आटोपून परतत होते. दुसर्या कारमधील चालक सोनभद्र जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य हाती घेत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जखमी ट्रक चालक आणि क्लिनरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासात ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, अपघातग्रस्त भागातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलीसांनी प्रयत्न करून वाहतूक पूर्ववत केली असून पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS