आश्वासनाने उपोषण संपले, पण नागरिकांच्या प्रश्नांचे खड्डे कायम! नांदेड : नांदेड शहरालगतच्या आणि जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक
आश्वासनाने उपोषण संपले, पण नागरिकांच्या प्रश्नांचे खड्डे कायम!

नांदेड : नांदेड शहरालगतच्या आणि जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या पावडेवाडी गावाला जोडणार्या मोर चौक (काबरा नगर) ते पावडेवाडी या महत्त्वाच्या रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ग्रामपंचायतीसमोर सुरू असलेले उपोषण उत्तर नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी संबंधित अधिकार्यांकडून आश्वासन मिळवून उठविण्यात यश मिळवले असले, तरी रस्ता प्रत्यक्षात कधी होणार? हा मूलभूत प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरितच आहे.
या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असून, काही अंतरापर्यंत डांबरीकरण झाले असले तरी पुढील संपूर्ण मार्ग खड्ड्यांनी व्यापलेला आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे वाहनचालक आणि नागरिकांसाठी मोठी कसरत ठरत आहे. शहरातून बाहेर पडणारा आणि पावडेवाडीसह परिसरातील अनेक गावांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आजही विकासाच्या प्रतीक्षेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. उपोषणकर्त्यांनी सर्वात गंभीर आरोप रस्त्याच्या टचअपसाठी मंजूर झालेल्या सुमारे ६० लाख रुपयांच्या निधीवर केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या निधीतून केवळ काही ठिकाणी मुरूम टाकून किरकोळ काम करण्यात आले. उर्वरित निधीचा वापर नेमका कुठे झाला, याबाबत प्रशासनाने स्पष्ट खुलासा करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नसली, तरी या निधीच्या खर्चाबाबत चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.
या मार्गावर एका मंत्र्यांच्या शैक्षणिक संस्थेचे अस्तित्व असतानाही रस्त्याची अवस्था बदलत नसल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, राजकीय प्राधान्यक्रम बदलल्यामुळे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले असून, विकासाचा हा प्रश्न राजकीय समीकरणांमध्ये अडकून पडला आहे. दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विकासाचे प्रश्न पुन्हा चर्चेत आले आहेत. पावडेवाडीतील युवक आणि नागरिकांनी रस्त्याच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. आमदार बालाजी कल्याणकर यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून संबंधित अधिकार्यांकडून सकारात्मक आश्वासन मिळवून उपोषण मागे घेण्यास प्रवृत्त केले.
मात्र नागरिकांचे म्हणणे स्पष्ट आहे—आश्वासनांची मुदत संपली असून आता रस्त्यावर डांबर दिसले पाहिजे. मोर चौक ते पावडेवाडी हा रस्ता केवळ वाहतुकीचा मार्ग नसून हजारो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. त्यामुळे मंजूर निधीचा हिशेब, रखडलेल्या कामामागील कारणे आणि रस्ता पूर्ण करण्याचे निश्चित वेळापत्रक प्रशासनाने जाहीर करावे, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे. अन्यथा आगामी निवडणुकांमध्ये हा रस्ता विकासाचा नव्हे, तर जनतेच्या रोषाचा प्रमुख मुद्दा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS