नांदेड : माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण आणि आमदार श्रीजया चव्हाण यांच्या मतदारसंघातील भोकर तालुक्यातील किणी गावातील विद्यार्थ्यांना श

नांदेड : माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण आणि आमदार श्रीजया चव्हाण यांच्या मतदारसंघातील भोकर तालुक्यातील किणी गावातील विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या अभावामुळे शाळेला कुलूप ठोकून आंदोलन करण्याची वेळ आल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते तथा युवक काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे पाटील यांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या मागणीची तातडीने पूर्तता न झाल्यास काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात गाडे पाटील म्हणाले की, किणी येथील विद्यार्थी आम्हाला शिक्षक पाहिजेत या मागणीसाठी सोमवारी सकाळपासून शाळेसमोर आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांनी संबंधित अधिकार्यांशी तसेच लोकप्रतिनिधींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार कोणाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी असून ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेचे वास्तव अधोरेखित करणारी असल्याचे त्यांनी नमूद केले. हा प्रकार उत्तर प्रदेश किंवा बिहारमधील नसून आपल्या नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात घडत आहे, ही बाब अधिक चिंताजनक आहे, असे सांगत गाडे पाटील यांनी शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गरीब आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न हा कोणत्याही राजकारणापलीकडचा असून शासनाने तातडीने शिक्षकांची नियुक्ती करून शाळेतील शैक्षणिक वातावरण पूर्ववत करावे, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन करेल, असा इशाराही बालाजी गाडे पाटील यांनी दिला आहे.

COMMENTS