छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे शेतातील विहिरीत मोटारपंप बसविताना विहीर खचून वडिलांसह दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृ

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे शेतातील विहिरीत मोटारपंप बसविताना विहीर खचून वडिलांसह दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृतांमध्ये बाजीराव सर्जेराव काकडे, आजिनाथ बाजीराव काकडे आणि श्याम बाजीराव काकडे यांचा समावेश आहे. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हे तिघे शेतातील विहिरीत उतरून मोटारपंप बसविण्याचे काम करत होते. त्याच वेळी अचानक विहिरीचा काही भाग खचला आणि कठडे तिघांच्या अंगावर कोसळले. त्यामुळे ते माती व दगडांच्या ढिगार्याखाली दबले गेले. घटनास्थळावर मोठा आवाज झाल्यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. उपलब्ध साधनांच्या सहाय्याने माती व दगड बाजूला करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, तिघांनाही बाहेर काढेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. काकडे कुटुंबातील तिन्ही सदस्य मेहनती व कुटुंबाचा आधारस्तंभ मानले जात होते. एका क्षणात कुटुंबातील तिन्ही कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रविवारी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

COMMENTS