देवळाली प्रवरा : राहुरी फॅक्टरी परिसरातील प्रसादनगर येथे अवजड वाहनाने विद्युत पोल उडवून दिला, ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाला, हजारो नागरिक तीन दिवस

देवळाली प्रवरा : राहुरी फॅक्टरी परिसरातील प्रसादनगर येथे अवजड वाहनाने विद्युत पोल उडवून दिला, ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाला, हजारो नागरिक तीन दिवस अंधारात होते तरीही संबंधित वाहनावर अद्याप गुन्हा दाखल नाही. या प्रकारामुळे महावितरणच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
शनिवारी (ता. ११) रात्री सुमारे ९ वाजता ताहाराबाद रस्त्यावरील प्रसादनगर भागात एका भरधाव अवजड वाहनाने महावितरणच्या सिमेंट पोलला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पोल तुटून थेट घरावर कोसळला. घराच्या भिंतीसह दुचाकीचे मोठे नुकसान झाले. तसेच विद्युत वाहिन्या जमिनीवर पडल्या आणि जवळील २०० केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर पेट घेऊन जळून खाक झाला. सुदैवाने जीवितहानी टळली.
या घटनेनंतर प्रसादनगर, गुरुकुल वसाहत आणि समर्थ नगर या तीन मोठ्या भागांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. सलग तीन दिवस शनिवारी रात्रीपासून सोमवारी रात्रीपर्यंत नागरिकांना अंधारातच काढावे लागले.
दरम्यान, महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान होऊनही संबंधित अवजड वाहन चालक व मालकाविरोधात अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. नवीन पोल, वीजवाहिन्या आणि ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी महावितरणला मोठा खर्च करावा लागला आहे.
या संदर्भात प्रभारी विद्युत अभियंता अहिरे यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. “वरिष्ठांच्या आदेशाशिवाय गुन्हा दाखल होणार नाही,” असे सांगत त्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अपघात करणाऱ्या वाहनाला जाणीवपूर्वक पाठीशी घातले जात आहे का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
चिरीमिरीचा खेळ?
कारवाई न होण्यामागे काही ‘सेटिंग’ तर नाही ना? संबंधित वाहन चालकाकडून ‘चिरीमिरी’ घेऊन प्रकरण दाबले जात असल्याची जोरदार चर्चा सध्या राहुरी फक्टरीत रंगली आहे. दरम्यान या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

COMMENTS