कुकडी पाण्याबाबत दिवा विझण्यापूर्वीची धडपड बंद करावी : पप्पूशेठ धोदाड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुकडी पाण्याबाबत दिवा विझण्यापूर्वीची धडपड बंद करावी : पप्पूशेठ धोदाड

कर्जत/प्रतिनिधी : कुकडी आवर्तनांची गेल्या काही दिवसात थट्टा करण्याचे काम काही लोकांकडून करण्यात आले. आणि हा मतदारसंघ पुन्हा दुष्काळी छायेत जातो की का

पोल्ट्री धारकांचे प्रलंबित प्रश्‍न सोडवू
निवडणुकीत बहुमत म्हणजे धार्मिक बहुमत नव्हे…: अ‍ॅड. असीम सरोदे यांचे प्रतिपादन
डॉ. रामकृष्ण जगताप यांची ’श्रीरामपूर साहित्य परिषद ’अध्यक्षपदी निवड

कर्जत/प्रतिनिधी : कुकडी आवर्तनांची गेल्या काही दिवसात थट्टा करण्याचे काम काही लोकांकडून करण्यात आले. आणि हा मतदारसंघ पुन्हा दुष्काळी छायेत जातो की काय? कुकडीच्या पाण्याबाबत कोणतीही कृती न करता फक्त पत्रकबाजी करणाऱ्यांचे अडीच ते तीन वर्षांत पाण्याबाबत योगदान काय? असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे मतदारसंघात एक प्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशा या कठीण परिस्थितीत पुन्हा एकदा प्रा. राम शिंदे आमदार झाले, आणि आपल्या मायमातीत कुकडीचे पाणी खेळवण्याचे पहिले काम त्यांनी हाती घेतले, अशी कुकडी आवर्तनावर प्रतिक्रिया प्रसिध्दी पत्रकाद्वारे कुंभेफळचे उपसरपंच पप्पूशेठ धोदाड यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, तालुक्यातील सर्व तलाव पुर्ण क्षमतेने भरण्याचा सपाटाच आ. प्रा. शिंदे यांनी लावला, आणि सर्व तलावात पाणी पोहचले का नाही याची जातीने स्वतः अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणीसुद्धा केली. प्रसंगी पाणी पूजन किंवा सत्कार कार्यक्रम कटाक्षाने प्रा. शिंदे टाळत आहेत. कारण त्यांच्यासाठी हा विषय नवीन नाही. याची जाणीव त्यांच्या प्रत्येक वर्तनातून होत आहे. एखाद्या ठिकाणी ग्रामस्थांनी सत्काराचा जास्तच आग्रह धरला तर फेटा गळ्यात परिधान करत आहेत. पाणी पूजनास स्पष्ट शब्दात नकार देत गावकऱ्यांनाच तो अधिकार देत पाणी पाठवून देण्याचे काम माझे असल्याचे सांगून भंपकपणाला काट देताना दिसत आहेत.  खरे तर गेली अडीच तीन वर्षे कुकडी नियोजनाच्या अभावामुळे या भागातील शेती अन् शेतकरी उध्वस्त झाला होता. पाण्यासाठी होरपळत होता. याची जाणीव मोठ्या राजकीय नेत्यांना देखील झाली असावी आणि म्हणून काही पुढाऱ्यांना कुकडी पाण्याचा विषय तसा कुतूहलाचा वाटला असावा म्हणून  नावीन्यपूर्ण गोष्टींचा स्विकार करताना त्याची विधीवत पूजा करण्यासाठी काही लोकांची धावपळ होताना दिसते आहे. मात्र कुकडी प्रश्नात काहीही कृती न करण्याचे काम ज्या लोकांनी केले त्या लोकांना पाणी पूजन करताना अपराधीपणाची भावना जाणवत असतानाच जनताही योगदान विचारते आहे. अशा खोचक शब्दात धोदाड यांनी टीका केली आहे. वास्तविक पाहता गेल्या दोन तीन वर्षांत कुकडी पट्टा पूर्णपणे उध्वस्त करण्याच्या हेतूने काही लोकांकडून, उन्हाळी आवर्तन पावसाळ्यात आणि पावसाळी आवर्तन उजनी धरणात अशा स्वरूपाचा एक कलमी कार्यक्रम सुरू होता. मात्र आता या सर्व गोष्टींना प्रा. राम शिंदे यांच्या हजरजवाबी नेतृत्वामुळे आळा बसला आहे. म्हणून तालुक्यातील प्रत्येक गाव दृष्टीक्षेपात ठेऊन नियोजनबद्ध आराखड्यानुसारच या वेळी कान्होळा नदीपात्रातील नेटकेवाडी, धांडेवाडी, कोरेगांव, लोणीमसदपूर, यासह सर्व बंधाऱ्यात, गलांडवाडी तलावात, पाटेवाडी तलावात, चापडगाव, निमगाव डाकू बंधाऱ्यात, चौंडी बंधाऱ्यात, बारडगाव तलावात, करमनवाडी तलावात, येसवडी तलावात, राक्षसवाडी तलावात आणि कुळधरण परिसरात, थेरवडी तलावात, दुरगाव तलावात, कोपर्डी तलावात, भोसा खिंड आणि सिना धरणाच्या परिसरातील शेतीला पुन्हा नवसंजीवनी निर्माण होतानाचे समाधान शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे. 
कारण आता शेती या पाण्याने बागायती होणार आहे. शेती उत्पन्न वाढणार आहे. दुष्काळ हटणार आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होईल आणि खऱ्या अर्थाने या तालुक्यांत विकासाची गंगा पाटपाण्यासोबत झुळझुळेल असा विश्वास पुन्हा एकदा या भागातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. कुणी कितीही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी मागील तीन वर्षे जमीनीच्या व शेतकऱ्यांच्या आयुष्यातील उन्हाळा जनता कधीही विसरणार नाही हे मात्र नक्की, असे धोदाड यांनी स्पष्ट केले. गेले तीन वर्षे जनतेतून कुकडी पाण्याची मागणी सातत्याने होत असताना देखील लोकप्रतिनिधींनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, आणि उन्हाळी आवर्तन गायब करत पावसाळ्यातील पाणी ज्वारीच्या आळाशात असा प्रकार केला. वास्तविक पाहता जर आवश्यक त्या योग्य वेळी पाणी दिले असते तर आज पाणी हा विषय तुमच्यासाठी कुतूहलाचा ठरलाच नसता. आणि आता ओढवलेली नामुष्की टाळता आली असती. त्यामुळे कितीही श्रेयाचा अट्टाहास केला तरी याचे खरे हक्कदार प्रा. राम शिंदे हेच आहेत, हे आता जनतेच्या लक्षात आले आहे. त्यामुळे दिवा विझण्यापूर्वीची धडपड आता बंद करावी, ही सामान्य जनतेची माफक अपेक्षा आहे. अशी टीका धोदाड यांनी केली.

COMMENTS