बीड : शहरानजीक असलेल्या पाली गावात सतत होणार्या वीज खंडिततेमुळे ग्रामस्थ अक्षरशः वैतागले असून महावितरणच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस


बीड : शहरानजीक असलेल्या पाली गावात सतत होणार्या वीज खंडिततेमुळे ग्रामस्थ अक्षरशः वैतागले असून महावितरणच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वारंवार बत्तीगुल होत असल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून शेतीची कामेही ठप्प पडत आहेत. पिकांवर याचा थेट परिणाम होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
गावामध्ये अनेक ठिकाणी डीपी (ट्रान्सफॉर्मर) उघड्या अवस्थेत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांसह मुक्या जनावरांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय अनेक वीज खांबांवरील तारा लोमकळत असल्याने दुर्घटनेची शक्यता अधिकच वाढली आहे. कोणतीही मोठी जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी महावितरणवरच राहील, असा इशारा सरपंच महेंद्र वीर यांनी दिला आहे. दरम्यान, वारंवार तक्रारी करूनही लाईनमन आणि संबंधित अभियंते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने ग्रामस्थांचा संताप उफाळून आला आहे. तसेच सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर देखील होत आहे. वीजपुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच महेंद्र वीर यांनी दिला असून, महावितरणच्या निष्क्रिय आणि बेफिकीर कारभाराविरोधात ग्रामस्थ आता आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत.

COMMENTS