Homeताज्या बातम्यासंपादकीय

वादळापूर्वीची शांतता

राजकीय वादळ असो की, नैसर्गिक वादळ असो, की मानवाच्या शरीरातील दुखणे असो प्रत्येक बाब वादळापूर्वी संकेत देत असते. नैसर्गिक वादळापूर्वी काही संकेत प

न्यायपालिका – सरकार संघर्ष वाढणार
पोटनिवडणुकीचा घोळ
राजकीय संघर्ष

राजकीय वादळ असो की, नैसर्गिक वादळ असो, की मानवाच्या शरीरातील दुखणे असो प्रत्येक बाब वादळापूर्वी संकेत देत असते. नैसर्गिक वादळापूर्वी काही संकेत प्राप्त होतात, ते समजून घ्यावे लागतात, अन्यथा नुकसान होते. राजकीय वादळापूर्वी देखील काही संकेत प्राप्त होत असतात, ते समजून डॅमेज कंट्रोल रोखणे गरजेचे असते, अन्यथा राजकीय नुकसान होण्याची शक्यता असते. तसेच मानवी शरीराचे देखील आहे. मानवी शरीर काही आजारांचे संकेत देत असतात, ते संकेत ओळखता आले तर, त्वरित सर्जरी करून, पुढील धोका टाळता येतो. मात्र हे संकेत प्रत्येकाला समजतातच असे नाही. मात्र राज्याच्या राजकारणात काही दिवसांपासून राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. या घडामोडी पडद्याआड होत असल्या तरी, राज्यात सत्तेच्या दिशेने काहीतरी होणारी ही चाहूल प्रत्येकाला लागलेली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जरी बंडाच्या चर्चा फेटाळून लावत आपण राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट केले असले तरी, बुधवारी ज्या घडामोडी सुरू आहेत, यावरून राज्यात लवकरच नवे राजकीय समीकरण अस्तित्वात येणार असल्याचे राजकीय संकेत मिळतांना दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामाची आवराआवर, ’मिशन नो पेन्डसी’चे केलेले ट्विव सहज केलेले नाही. त्यामागे मोठा राजकीय अर्थ दडलेला आहे. याचाच अर्थ राज्यात पुन्हा नवे सरकार येणार आहे,

असाच संदेश तर फडणवीस आपल्या ट्विटमधून देत नसावेत. एकीकडे राजकीय घडामोडी घडतांना दिसून येत आहे. आशिष शेलार, चंद्रशेखर बावनुकळे राजधानीत जावून केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेवून येतात, आणि उपमुख्यमंत्री फडणवीस मंत्रालयात फायलींचा निपटारा करतांना दिसून येतात. त्यातच त्यांचे ट्विट हे या घडामोडींवर नसून, मिशन नो पेन्डसीवर आहे. याचाच अर्थ राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथ घडण्यासाठी काही तास उरलेत, लवकरात लवकर कामे उरकून घ्या, असाच संदेश ते आपल्या ट्विटमधून देत असावेत. विशेष म्हणजे अजित पवारांनी पक्ष सोडण्याचे वृत्त फेटाळून लावले. याचबरोबर अजित पवारांची प्रतिमा डागाळत असतांना, त्यांच्याविरोधात बंडाच्या बातम्या येत असतांना, यावर मळभ दूर करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पुढे यावे लागते, यातच सारे काही आले. शिवाय दुसर्‍या दिवशी अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. देवगिरीवर सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि अनिल देशमुख यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटी या सहजरित्या झालेल्या नाहीत. तर यातून अनेक अर्थ ध्वनीत होतांना दिसून येत आहे. त्यामुळे ही वादळापूर्वीची शांतता असली तरी, राज्यात राजकीय उलथापालथ होणार हे नक्की. भाजपच्या सर्व्हेमधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

त्यामुळे भाजपला आपल्यासोबत अजित पवार हवे आहेत, किंवा सरळ-सरळ राजीनामा देवून, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपचा मानस दिसून येत आहे. राष्ट्रपती राजवटीमुळे भाजपला आपल्या प्रतिमेचे संवर्धन करण्यास वेळ मिळेल. त्यातून भाजप आपला जनाधार पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न करेल, ज्यातून भाजपला आगामी निवडणूका लढणे सोपे होईल, आणि भाजप सत्तास्थानी पोहचेल. मात्र अजित पवार भाजपमध्ये जाईल का, हा प्रश्‍न अनुत्तरितच राहात असला तरी, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँगे्रसचे आमदार शरद पवार जोपर्यंत ग्रीन सिग्नल देत नाही, तोपर्यंत भाजपसोबत जाणार नसल्याचे दिसून येत आहे. मात्र शरद पवारांची मूकसंमती आणि राज्यातील राजकीय घडामोडी अवघ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच.  

COMMENTS