अमृतसर : पंजाब राज्यात मंगळवारी घडलेल्या दोन स्फोटांच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले असून सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उ

अमृतसर : पंजाब राज्यात मंगळवारी घडलेल्या दोन स्फोटांच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले असून सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जालंधर येथील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयाबाहेर झालेल्या स्फोटानंतर काही तासांतच अमृतसरमधील लष्करी तळाजवळही स्फोट झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
जालंधर येथे संध्याकाळच्या सुमारास मुख्यालयाबाहेर उभी असलेल्या दुचाकीत अचानक स्फोट झाला. स्फोटाचा आवाज मोठ्या परिसरात ऐकू गेल्याने एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, एक तरुण दुचाकी उभी करून पार्सल देण्यासाठी आत गेला असताना ही घटना घडली. स्फोटात दुचाकीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. घटनेनंतर सुरक्षा दल आणि पोलिसांनी तातडीने परिसर बंदिस्त करून तपास सुरू केला. तज्ज्ञ पथकाने घटनास्थळी तपासणी करत पुरावे गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे. या घटनेनंतर रात्री उशिरा अमृतसरमधील खासा परिसरात लष्करी तळाच्या बाहेर जोरदार स्फोट झाला. रात्री अकराच्या सुमारास झालेल्या या स्फोटाचा आवाज दूरवरपर्यंत ऐकू गेला. अचानक झालेल्या स्फोटामुळे नागरिक घाबरून घराबाहेर पडले. प्राथमिक तपासात तळाच्या बाहेरील पत्र्यांना नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर जखमी झाल्याची नोंद नाही. दोन्ही घटनांनंतर पोलिस आणि लष्कराने मोठ्या प्रमाणावर सुरक्षा वाढवली असून संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तपासासाठी तज्ज्ञ पथके, श्वान पथक यांना पाचारण करण्यात आले आहे. घटनास्थळांवरील पुरावे गोळा करून सखोल तपास सुरू आहे. या स्फोटांचा परस्पर संबंध आहे का, तसेच यामागे एखादे संघटित जाळे किंवा कटकारस्थान आहे का, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत. काही दिवसांपूर्वीही राज्यातील इतर ठिकाणी अशाच प्रकारच्या घटना घडल्याने परिस्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे. अधिकार्यांच्या माहितीनुसार, तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही ठोस निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. मात्र या घटनांकडे अत्यंत गंभीरतेने पाहिले जात असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षेचे उपाय अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.

COMMENTS