मूर्ख वृत्ती कलह निर्माण करते, तर विद्वान आपल्या ज्ञानाच्या बळावर समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करतात. त्यामुळे प्रत्येकाने आत्मचिंतन करून आप

मूर्ख वृत्ती कलह निर्माण करते, तर विद्वान आपल्या ज्ञानाच्या बळावर समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करतात. त्यामुळे प्रत्येकाने आत्मचिंतन करून आपण नेमके कोण आहोत, याचा विचार केला पाहिजे. एखाद्या विषयाचे ज्ञान नसेल तर मौन बाळगणेच हितावह असते. माणूस जितका शांत राहील तितके त्याचे दोष इतरांना कळत नाहीत. त्यामुळे ‘मौन’ हेच सर्वोत्तम आणि कल्याणकारी असल्याचे प्रतिपादन कथा निरूपणकार प्रसाद महाराज काष्टे यांनी केले.
बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आषाढी वारीनिमित्त स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित तीन दिवसीय ‘नीतीशतक’ विषयावरील संगीतमय कथामालेच्या दुसर्या दिवशी ते भाविकांना मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड यांच्या हस्ते प्रसाद महाराज काष्टे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून ‘नीतीशतक’मधील विविध मूल्यांचा उहापोह केला. मार्गदर्शन करताना ते म्हणाले, जसा कोळसा कितीही घासला तरी पांढरा होत नाही, त्याचप्रमाणे मूर्ख व्यक्तीला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग होत नाही. अशा ठिकाणी मौन बाळगणेच सर्वांच्या हिताचे ठरते. निरूपणादरम्यान त्यांनी देशभर गाजलेल्या छएएढ परीक्षा पेपरफुटी प्रकरण या विषयावरही भाष्य केले. लाखो विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्वक परीक्षा दिल्यानंतर पेपरफुटीमुळे त्यांचे भविष्य संकटात येते. पैशासाठी विद्यार्थ्यांच्या भावना आणि भविष्याशी खेळणार्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अन्याय रोखण्यासाठी कायदा अधिक कठोर आणि प्रभावी असण्याची गरज असल्याचे सांगताना त्यांनी गुटखा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे उदाहरण दिले. कायद्याचा धाक निर्माण झाल्यास अनेक चुकीच्या प्रवृत्तींना आळा बसू शकतो, असेही ते म्हणाले. या अध्यात्मिक, प्रबोधनात्मक आणि संगीतमय कथेला बीड शहर व परिसरातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून मोठ्या संख्येने उपस्थित राहून कथामृताचा लाभ घेतला.

COMMENTS