पाटणा : बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना समोर आली असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विद

पाटणा : बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना समोर आली असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विद्यमान सरकार बरखास्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानंतर नितीशकुमार यांनी राज्यपालांकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजपच्या विधिमंडळाच्या बैठकीत सम्राट चौधरी यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली असून, मुख्यमंत्रीपदी देखील त्यांची निवड करण्यात आल्याची घोषणा भाजपकडून करण्यात आली.
तत्पूर्वी नितीशकुमार सरकार बरखास्त करण्यासाठी सुमारे वीस मिनिटे चाललेल्या या बैठकीत सर्व मंत्र्यांनी एकमताने या प्रस्तावास मान्यता दिली. त्यामुळे राज्यातील सत्तास्थितीत मोठा बदल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बैठकीदरम्यान मंत्र्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री भावूक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यांनी आपण दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले, मात्र तेथूनही राज्यातील घडामोडींवर लक्ष ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. आपल्या सहकार्यांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळ विसर्जित करण्याची अधिकृत घोषणा केली. या निर्णयामुळे बैठकीत काही काळ भावनिक वातावरण निर्माण झाले. बैठकीनंतर मंत्री लखेंद्र पासवान यांनी हा क्षण अत्यंत भावनिक असल्याचे सांगितले. त्यांनी सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करत बिहारच्या विकासासाठी झालेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीत अधिक जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले. मंत्री राम कृपाल यादव यांनीही या निर्णयाला भावनिक वळण असल्याचे नमूद केले. त्यांनी सांगितले की, नितीश कुमार यांनी जवळपास दोन दशकांहून अधिक काळ राज्याच्या विकासासाठी सातत्याने काम केले असून आता ते राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर करणार आहेत. मंत्री लेसी सिंग यांनीही या काळातील सहकार्याचा उल्लेख करत अशा नेतृत्वासोबत काम करण्याचा अनुभव अभिमानास्पद असल्याचे सांगितले.
मंत्रिमंडळ बरखास्त केल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंगळवारी दुवारी राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर केला. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष कडून विधिमंडळ पक्षाची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. नवीन सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला असून संभाव्य शपथविधी सोहळ्याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या घडामोडींमुळे बिहारच्या सत्तासमीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आगामी काही दिवसांत राज्याच्या राजकारणाला नवे वळण मिळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
आज होणार नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी
बिहार राज्यातील नितीशकुमार सरकार बरखास्त करण्यात आल्यामुळे आता नवीन सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, भाजपचे सम्राट चौधरी आज बुधवारी लोकभवन येथे राज्यपालांकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्यामुळे भाजपचा बिहारमध्ये मुख्यमंत्री होतांना दिसून येत आहे.

COMMENTS