बिलोली - आजपर्यंतच्या राजकीय जीवनात सत्तेचा वापर केवळ सर्वसामान्यांचे प्रश्न आणि विकासकामे मार्गी लावण्यासाठी केला असून, यापुढेही हीच भूमिका कायम

बिलोली – आजपर्यंतच्या राजकीय जीवनात सत्तेचा वापर केवळ सर्वसामान्यांचे प्रश्न आणि विकासकामे मार्गी लावण्यासाठी केला असून, यापुढेही हीच भूमिका कायम ठेवणार, असे प्रतिपादन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) बिलोली तालुक्याच्या वतीने आमदार चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त विश्रामगृह मैदानावर अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल डॉ. मिनलताई खतगावकर यांचाही सत्कार करण्यात आला. चिखलीकर व डॉ. खतगावकर यांचे बिलोलीत आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी तसेच क्रेनच्या सहाय्याने पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. त्यानंतर चिखलीकर व डॉ. खतगावकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना चिखलीकर म्हणाले, मी सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आहे. जनतेच्या प्रेम आणि आशीर्वादामुळे सरपंचपदापासून जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा बँकेचे संचालक, आमदार आणि खासदारपदापर्यंतचा प्रवास करता आला. मिळालेल्या सत्तेचा उपयोग जनतेच्या हितासाठी केला. मी जात मानली नाही; लोकांच्या भल्यासाठी काम करणे हीच माझी जात आहे. राजकारणात कै. शंकरराव चव्हाण यांच्यामुळे प्रवेश झाला असून कै. विलासराव देशमुख, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सहवासात काम करण्याची संधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. जनतेची सेवा केली; मात्र कधीही दलाली केली नाही, असेही चिखलीकर म्हणाले. यावेळी डॉ. मिनलताई खतगावकर, माजी आमदार सुभाष साबणे, युवा जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील नागणीकर आणि श्रीनिवास नरवाडे यांनी चिखलीकरांना मंत्रीपद मिळावे, अशा शुभेच्छा दिल्या. आमदार चिखलीकर यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनींना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन भाऊसाहेब बनबरे यांनी केले.

COMMENTS