नवी दिल्ली : उत्तर भारतातील अनेक राज्यांना मुसळधार पाऊस, पूर आणि दरड कोसळण्याच्या घटनांचा मोठा फटका बसला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये प्रतिकूल हवामाना

नवी दिल्ली : उत्तर भारतातील अनेक राज्यांना मुसळधार पाऊस, पूर आणि दरड कोसळण्याच्या घटनांचा मोठा फटका बसला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये प्रतिकूल हवामानामुळे अमरनाथ यात्रा शनिवारी पुन्हा स्थगित करण्यात आली. जम्मू परिसरात आगामी काही दिवस मुसळधार पावसासह पूर आणि दरड कोसळण्याचा धोका कायम असल्याने यात्रेकरूंच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे.
जम्मू भागात ११ ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डोंगराळ भागात सतत पाऊस सुरू असल्याने दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जम्मूहून अमरनाथकडे जाणाऱ्या यात्रेच्या मार्गावर विशेष खबरदारी घेतली जात आहे. परिस्थिती सामान्य होईपर्यंत यात्रा थांबवण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दिल्ली आणि गुरुग्रामला जोडणाऱ्या प्रमुख महामार्गासह शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. काही ठिकाणी चार फुटांपर्यंत पाणी साचल्याने अनेक वाहने रस्त्यातच अडकली. पाणी साचल्यामुळे वाहनांचा वेग मंदावला आणि अनेक मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. कार्यालये आणि कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही भागांत वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला. हवामान विभागाने दिल्लीसाठी अतिधोक्याचा इशारा दिला आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच दिल्लीत १२७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. २०११ नंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातील ही सर्वाधिक पावसाची नोंद असल्याचे सांगण्यात येत आहे. बिहारमध्येही मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती गंभीर होत आहे. नेपाळच्या परिसरात झालेल्या पावसाचा परिणाम बिहारमधील नद्यांच्या पाणीपातळीवर झाला आहे. मुझफ्फरपूर जिल्ह्यातील बागमती नदी दुथडी भरून वाहत आहे. बगहा परिसरात गंडक नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात वाढले असून, पुराचे पाणी सुमारे ३०० घरांमध्ये शिरले आहे. अनेक कुटुंबांच्या घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाकडून पूरग्रस्त भागातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. आग्रा येथे मुसळधार पावसामुळे रस्ता खचल्याची घटना घडली. रस्ता खचल्याने सुमारे २० फूट खोल खड्डा निर्माण झाला. या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून, प्रशासनाने धोकादायक भागात खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. उत्तर प्रदेशात गेल्या २५ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. काही नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने नदीकाठच्या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाराणसीमध्ये गंगेच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठचे अनेक घाट पाण्याखाली गेले आहेत. शहरातील ८४ घाटांमधील परस्पर संपर्क काही प्रमाणात तुटला आहे. घाट परिसरातील सुमारे ५० ते ६० लहान मंदिरांमध्येही पुराचे पाणी शिरल्याची माहिती आहे.

COMMENTS