मुंबई : राज्यभर प्रचंड उष्णता, वाढता उकाडा आणि उष्ण वाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच मान्सूनबाबत दिलासादायक संकेत मिळू लागले आहेत. यंदा नैऋ

मुंबई : राज्यभर प्रचंड उष्णता, वाढता उकाडा आणि उष्ण वाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच मान्सूनबाबत दिलासादायक संकेत मिळू लागले आहेत. यंदा नैऋत्य मान्सूनचे अंदमान बेटांवरील आगमन नेहमीपेक्षा काही दिवस आधी होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनच्या हालचालींना वेग मिळत असून त्याचा परिणाम पुढील काही दिवसांत स्पष्टपणे दिसून येऊ शकतो.
हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार, १२ आणि १३ मे दरम्यान विषुववृत्तीय परिसर तसेच बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पश्चिम भागात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. या वातावरणीय बदलामुळे समुद्राकडून येणाऱ्या दमट वाऱ्यांचा वेग वाढणार असून मान्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल स्थिती निर्माण होईल. त्यामुळे मान्सूनचे अंदमानातील आगमन सरासरी वेळेपेक्षा आधी होण्याचे संकेत मिळत आहेत. यापूर्वी हवामान तज्ज्ञांनी मान्सून १४ ते २२ मे दरम्यान अंदमान बेटांवर दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र सध्याच्या वातावरणीय घडामोडी पाहता मान्सूनचे आगमन आणखी लवकर होण्याची शक्यता बळावली आहे.
अंदमानात मान्सून दाखल झाल्यानंतर त्याला कोकण किनारपट्टीपर्यंत पोहोचण्यासाठी साधारणपणे तीन आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे अंदमानात मान्सून वेळेआधी पोहोचल्यास महाराष्ट्रातही पावसाचे आगमन नियोजित वेळेपेक्षा काही दिवस आधी होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे. भारतीय हवामान विभागानेही १४ ते २० मे दरम्यान अंदमान समुद्र परिसरात नैऋत्य दिशेचे वारे सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हे वारे मान्सूनच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे या वाऱ्यांना अधिक बळ मिळणार असून मान्सूनची आगेकूच वेगाने होण्याची शक्यता आहे.
राज्यात उष्णतेची तीव्रता कायम
मान्सूनच्या आगमनाबाबत सकारात्मक चित्र तयार होत असले तरी राज्यातील उष्णतेची तीव्रता अद्याप कायम आहे. पालघर, कल्याण आणि डोंबिवली परिसरात तापमानाने ४० ते ४४ अंशांचा टप्पा गाठला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांचे हाल होत असून दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. कोकण किनारपट्टीवर हवेत आर्द्रतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने उकाडा अधिकच असह्य झाला आहे.

COMMENTS