नियोजनाचा अभाव

Homeताज्या बातम्यासंपादकीय

नियोजनाचा अभाव

महाराष्ट्रात तीनही ऋतूमध्ये जनतेची फरपट होते. याला नागरिकांसह आपले सरकार जबाबदार आहे. पावसाळ्यात बरबटलेले रस्ते त्याचप्रमाणे रस्त्यातील खड्ड्यांत झाल

आंदोलन बंदी ही तर, मुस्कटदाबी
एसटीची वाटचाल गिरणी कामगारांच्या वाटेवर
संसदेची सुरक्षा आणि त्या तरूणांची मानसिकता

महाराष्ट्रात तीनही ऋतूमध्ये जनतेची फरपट होते. याला नागरिकांसह आपले सरकार जबाबदार आहे. पावसाळ्यात बरबटलेले रस्ते त्याचप्रमाणे रस्त्यातील खड्ड्यांत झालेली असंख्य डबकी, ठिकठिकाणी साचणारे पाणी, तुंबलेले नाले-गटार, अस्वच्छता व त्यातून पसरणारे साथीचे आजार, गेल्या कित्येक वर्षांपासून दर पावसाळ्यात अशीच परिस्थिती असते. महाराष्ट्रात सरकार कुणाचेही असो, मुख्यमंत्री, मंत्री बदलतात समस्या मात्र आहे तस्याच राहतात. कामचुकार प्रशासन व ढिम्म व्यवस्था यावर ठोस उपाययोजना करण्यात मनापासून पुढाकार घेत नाही. सध्याचं राज्यातील वातावरण पाहिलं तर प्रशासनाची उदासिनता स्पष्ट दिसून येईल असे आहे. शहर कसे असावे याबाबतचं नियोजनच आपल्या धोरणकर्त्यांकडे नसते. त्यामुळे पाऊस  आला की, गावे वाहून जातात. जमिनी वाहून जातात. घरात पाणी घुसते. असे असंख्य प्रश्न पावसाळ्यात उद्भवतात. हिवाळा आणि उन्हाळा या दोन्ही वृतूमध्ये देखील विविध असंख्य समस्या असतात.
साफसफाई हे पावसाळ्यातील महत्त्वाचे काम आहे. जे प्रत्येक पावसाळ्यात थातुरमातुर केले जाते. त्यात मॉन्सूनपूर्व व मॉन्सून दरम्यान असा दोन पातळ्यांवर हे काम हाती घेतले जाते. पण आपल्या व्यवस्थेमध्ये  भ्रष्ठाचार असल्यामुळे कामे पाहिजे तशी होत नाहीत. दरवर्षी ही साफसफाई कागदावरच असते. त्यात केवळ एखाद्या पावसामुळे साचणाऱ्या पाण्याने प्रशासनाचे डोळे उघडले जातात. पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई व गटार स्वच्छता केली जाईल असे नगरपालिका, महानगर पालिका प्रशासनाकडून सांगितले जाते. वृत्तमान पत्रातून तशी प्रसिद्धी सुद्धा घेतली जाते मात्र प्रत्यक्षात कामे दर्जेदार केली जात नाहीत ही मोठी शोकांतिका आहे.  भारत देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ (कायदा क्र. ५३/२००५) हा संसदेत २५ डिसेंबर २००५ रोजी पारित झाला. भारत जसा जैव, सांस्कृतिक व भौगोलिक वैविध्यांचा देश आहे, तसाच तो नानाविध विनाशकारी आपत्तींचा देश म्हणूनही गणला जातो. भारतातील आपत्तींचे विस्तृत प्रमाण येथील विकासाला मोठ्या प्रमाणात बाधक ठरते. त्यात प्रामुख्याने सर्वात मोठी समस्या ही आपल्या नागरिकांची आहे. ती म्हणजे साफ सफाईचे जे कर्तव्य आहे ते निभवण्यामध्ये कुचराई केली जाते. प्रशासनाला धारेवर धरून पावसाळ्यापूर्वीचे कामे जनतेने करून घेतले तर समस्या हलक्या होतील.
पावसाळ्यात आरोग्याच्या समस्या देखील प्रचंड वाढलेल्या असतात. डॉक्टरांसाठी हे एक पैसे कमावण्याचे सिजन असते. पावसाळा सुरू झाला, की तापमानात सतत बदल होतात. हवेत एक प्रकारचा ओलावा आलेला असतो. सूर्य ढगांआड जातो; त्यामुळे उन्हाने जंतूंचा नाश होणे बंद होते. आपलीही प्रतिकार यंत्रणा कमकुवत होते. या सगळ्यातून पुढे सरसावतात सर्दी-खोकल्याचे विषाणू. एन्फ्ल्यूएन्झा व्हायरस म्हणजेच फ्ल्यूचा विषाणू यातील आघाडीवरचा कलाकार. काही वर्षांपासून सुरू झालेला स्वाइन फ्लू हा वेगळा आजार आहे. याची भीती जास्त आहे. आपण पावसाळ्यापूर्वीचे कामे प्रशासन करत नाही म्हणून त्यांना दोष देतो खरा पण पावसाळ्यापूर्वीचे आपले कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक नियोजन करत नाही. यात नियोजनाचा अभाव आहे. ते सर्वानी केले पाहिजे. 

COMMENTS