मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून ठाणे-पालघर मतदारसंघात नव्या राजक

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून ठाणे-पालघर मतदारसंघात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी (बविआ) यांच्यात जवळीक वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिज ठाकूर यांना विधान परिषदेसाठी संधी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
विरार, वसई, नालासोपारा आणि पालघर परिसरात बहुजन विकास आघाडीचा प्रभाव मोठा मानला जातो. या भागात पक्षाची मजबूत मतपेढी असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही त्यांचे अस्तित्व ठळक आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रभाव आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे गट प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भविष्यात बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना यांच्यात अधिकृत राजकीय सहकार्य किंवा विलीनीकरणाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, ठाणे-पालघर पट्ट्यात आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी शिंदे गटाला अतिरिक्त मतांची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत बहुजन विकास आघाडीची साथ निर्णायक ठरू शकते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळाचा विचार करता भाजपकडे सर्वाधिक मते असल्याचे चित्र आहे. भाजपकडे सुमारे ४४४ मतांचे बळ असल्याचे सांगितले जात असून शिंदे गटाकडे सुमारे ३४६ मते आहेत. दुसरीकडे बहुजन विकास आघाडीची ७१ मते या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
या नव्या घडामोडींमुळे शिंदे गटातील इच्छुकांमध्येही अस्वस्थता वाढल्याची चर्चा आहे. माजी आमदार रवींद्र फाटक हे या जागेसाठी इच्छुक मानले जात होते. त्यांनी मतदारसंघात संपर्क मोहीम आणि संघटनात्मक हालचाली सुरू केल्याचेही सांगितले जात होते. मात्र, बदलत्या राजकीय घडामोडींमुळे त्यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत क्षितिज ठाकूर यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता विधान परिषदेमार्फत त्यांचे पुनरागमन घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. विरोधी गटातील प्रभावी नेत्यांना सोबत घेत संघटन विस्तार करण्याची रणनीती शिंदे गट अवलंबत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

COMMENTS