मुंबई : “घरी बोलावून मंत्री केले, हीच माझी चूक झाली. जे लोभापायी गेले, त्यांना जाऊ द्या,” अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार

मुंबई : “घरी बोलावून मंत्री केले, हीच माझी चूक झाली. जे लोभापायी गेले, त्यांना जाऊ द्या,” अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर टीका केली. सोलापूर, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रहार पक्षाचे प्रमुख असलेल्या बच्चू कडू यांनी नुकताच त्यांचा पक्ष शिवसेनेत विलीन केला आणि विधान परिषदेची आमदारकी मिळवली. त्यानंतर मराठवाड्यातील प्रहार पक्षाच्या नाराज कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आमदार अंबादास दानवे, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हेदेखील त्यावेळी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. बच्चू कडू यांनी आपल्याला विकून टाकलं आणि मिंधे सेनेत प्रवेश केला. आपण स्वाभिमानी असल्यामुळे ठाकरेंच्या सोबत आलो आहोत. यापुढे नेहमी ठाकरेंच्या सोबत राहू असं यावेळी कार्यकर्त्यांनी म्हटलं.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता. घरी बोलवून त्याला मंत्री केला ही माझी चूक झाली. जे लोभापायी गेलेत, त्यांना जाऊ द्या. कार्यकर्ते माझ्यासोबतच आहेत याचा आनंद आहे.”
उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असताना बच्चू कडू हे प्रहार पक्षाचे एकमेव आमदार होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात त्यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली होती. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर बच्चू कडू हे त्यांच्यासोबत गुवाहाटीला गेले. आता काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी त्यांचा प्रहार पक्ष हा शिवसेनेत विलीन केला आणि विधान परिषदेवर आमदारकी मिळवली.
दरम्यान, आपण कोणत्या मंत्रिपदासाठी किंवा पदरात काही पाडून घेण्यासाठी शिवसेनेत गेलो नाही असं बच्चू कडू म्हणाले होते. जर मला काही मागायचे असते, तर मी गुवाहाटीला गेल्यावरच मागितले असते. मी पदासाठी नाही, तर दिव्यांग मंत्रालयासाठी भांडलो आहे, असं बच्चू कडू म्हणाले होते.

COMMENTS