कुंडलवाडी : बिलोली तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागाच्या कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी विविध गावांम
कुंडलवाडी : बिलोली तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागाच्या कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी विविध गावांमध्ये स्वतंत्र तलाठी कार्यालयांच्या इमारती उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी कार्यालयांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित ठिकाणी बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे महसूल सेवा अधिक सुलभ आणि नागरिकाभिमुख होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
बिलोली तालुक्यात 92 महसुली गावे, 36 तलाठी सज्जे आणि सहा महसूल मंडळे आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून बहुतांश गावांमध्ये तलाठ्यांसाठी स्वतंत्र शासकीय कार्यालय उपलब्ध नव्हते. काही ठिकाणी भाड्याच्या इमारतीतून तर काही ठिकाणी तात्पुरत्या जागेतून कामकाज चालत असल्याने नागरिकांना सातबारा उतारा, फेरफार, वारस नोंद, उत्पन्न व रहिवासी दाखले, पीक पाहणी आदी कामांसाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी महसूल विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांसाठी निधी आणि प्रशासकीय मंजुरी मिळवून दिली. पहिल्या टप्प्यात 18 गावांतील तलाठी कार्यालयांसाठी सुमारे 4 कोटी 1 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. कुंडलवाडी, चिटमोगरा, येसगी, गंजगाव, पिंपळगाव (कुं.) आणि अटकळी येथील तलाठी कार्यालयांची कामे पूर्ण झाली आहेत. सगरोळी, लोहगाव, आदमपूर, रामतीर्थ आणि गागलेगाव येथे बांधकाम प्रगतीपथावर असून कुंभारगाव, तळणी, सुलतानपूर, आरळी, खतगाव आणि अंजनी येथील कामे अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित गावांसाठी दुसर्या टप्प्यात निधी मंजूर होण्याची शक्यता आहे. याशिवाय बिलोली येथे तलाठी भवन तसेच तहसीलदार, अधिकारी व कर्मचार्यांच्या निवासस्थानांच्या बांधकामालाही मंजुरी मिळाली असून टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. स्वतंत्र तलाठी कार्यालये उपलब्ध झाल्याने नागरिकांचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि अनावश्यक हेलपाटे कमी होतील. मात्र, या इमारतींसोबत तलाठ्यांनीही मुख्यालयी नियमित उपस्थित राहून नागरिकांना वेळेत, पारदर्शक आणि दर्जेदार सेवा देणे आवश्यक आहे. महसूल सेवा खर्या अर्थाने गावागावात पोहोचल्यास बिलोली तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी हा मोठा दिलासादायक बदल ठरणार आहे.

COMMENTS