कोपरगाव : तालुक्यात ६ जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक गावांतील वीज खांब कोसळून विद्युत वाहक तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आ

कोपरगाव : तालुक्यात ६ जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक गावांतील वीज खांब कोसळून विद्युत वाहक तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, संबंधित भागात तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन नवीन वीज खांब उभारावेत, अशी मागणी आमदार विवेक कोल्हे यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) संगमनेर विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात आमदार कोल्हे यांनी म्हटले आहे की, वादळी पावसामुळे रवंदे, दहेगाव बोलका, खिर्डी गणेश, चासनळी तसेच परिसरातील अनेक गावांमध्ये वीज खांब व विद्युत वाहक तारांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, अनेक भागांतील वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळित झाला असून शेतकरी व नागरिकांना तीव्र गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे जनावरांच्या पाण्याचा तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीपंपांनाही वीज उपलब्ध होत नसल्याने ऐन हंगामात कृषी कामांवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे रवंदे, दहेगाव बोलका, खिर्डी गणेश, चासनळी तसेच संबंधित उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या गावांमधील वीज यंत्रणा तातडीने पूर्ववत करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणी आमदार विवेक कोल्हे यांनी केली आहे.

COMMENTS