बीड : माणसाने आपल्या जीवनात जितक्या उपाध्या वाढवल्या, तितके त्याचे मूळ साध्य त्याच्यापासून दूर जाते. ध्येय गाठायचे असेल तर उपाध्या कमी करून अपेक्

बीड : माणसाने आपल्या जीवनात जितक्या उपाध्या वाढवल्या, तितके त्याचे मूळ साध्य त्याच्यापासून दूर जाते. ध्येय गाठायचे असेल तर उपाध्या कमी करून अपेक्षाविरहित जीवन जगणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन साध्वी अनुराधा पंढरपूरकर यांनी केले.
येथील झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित ‘संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र कथा’ सोहळ्याच्या दुसर्या दिवशी त्या बोलत होत्या. दुसर्या पुष्पातील कथाभागात त्यांनी माऊली संत ज्ञानेश्वरांच्या जीवनचरित्राचा सविस्तर उलगडा केला. कार्यक्रमाची सुरुवात ‘कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला, ज्ञानोबा राया माझा ज्ञानोबा राया’ या मंगलाचरणाने भक्तिमय वातावरणात झाली. प्रारंभी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड यांच्या हस्ते साध्वी अनुराधा दीदींचा सत्कार करण्यात आला. कथन करताना त्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांचे जीवन, त्याग आणि आध्यात्मिक तेज यावर प्रकाश टाकला. उपस्थित भाविक कथा श्रवण करत भक्तिरसात तल्लीन झाले. पुढे बोलताना साध्वी म्हणाल्या, शिष्याने कधीही गुरूपेक्षा श्रेष्ठ असल्याचा अहंकार बाळगू नये. अहंकार जिथे येतो, तिथून अधःपतन सुरू होते. सेवा केवळ बोलण्यापुरती नसून ती कृतीतून दिसली पाहिजे. इतरांना मान देणे हाच खरा संस्कार आहे. त्या म्हणाल्या की, भगवंताची कथा हनुमानाप्रमाणे तन्मयतेने ऐकली पाहिजे. अतिपरिचयाने माणसातील गुण-दोष स्पष्ट होतात, मात्र गुरुपरंपरा आणि धार्मिक आचरणामुळे जीवनाला योग्य दिशा मिळते. कलियुगात शिस्त आणि धर्माचरण यांचे महत्त्व त्यांनी रामायणातील उदाहरणांद्वारे स्पष्ट केले. या कथेच्या श्रवणासाठी बीड शहर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS