नवी दिल्ली : राज्यसभेचे उपसभापती म्हणून हरिवंश नारायण सिंह यांची सलग तिसर्यांदा निवड झाली आहे. शुक्रवारी पार पडलेल्या प्रक्रियेत त्यांची बिनविरो

नवी दिल्ली : राज्यसभेचे उपसभापती म्हणून हरिवंश नारायण सिंह यांची सलग तिसर्यांदा निवड झाली आहे. शुक्रवारी पार पडलेल्या प्रक्रियेत त्यांची बिनविरोध निवड झाली असून विरोधकांकडून कोणतेही उमेदवार उभे करण्यात आले नव्हते. त्यामुळे सभागृहात त्यांच्याविषयी असलेला व्यापक विश्वास पुन्हा अधोरेखित झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरिवंश यांच्या निवडीचे स्वागत करताना म्हटले की, सलग तिसर्यांदा या पदावर निवड होणे ही केवळ औपचारिक बाब नसून सभागृहातील सदस्यांचा त्यांच्यावर असलेला पूर्ण विश्वास दर्शवते. गेल्या कार्यकाळात त्यांनी संयम, अनुभव आणि सर्वपक्षीय समन्वय राखत काम केले असल्याचेही त्यांनी नमूद केले. राज्यसभा सचिवालयाकडे हरिवंश यांच्या समर्थनार्थ एकूण पाच प्रस्ताव दाखल झाले होते. सभागृह नेते जे.पी. नड्डा यांनी पहिला प्रस्ताव मांडला, तर दुसरा प्रस्ताव नितीन नवीन यांनी सादर केला. इतर सदस्यांनीही या प्रस्तावांना पाठिंबा दिला. हरिवंश यांचा यापूर्वीचा कार्यकाळ 9 एप्रिल रोजी संपुष्टात आला होता. ते राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य असून राष्ट्रपतींकडून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभेत नामनिर्देशित सदस्यांची संख्या 12 असते आणि कला, साहित्य, विज्ञान तसेच समाजसेवा या क्षेत्रांतील योगदानाच्या आधारे त्यांची निवड केली जाते. 69 वर्षीय हरिवंश यांचा कार्यकाळ 2032 पर्यंत राहणार आहे.
18 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्या टप्प्यात निवृत्त होणार्या सदस्यांच्या निरोप समारंभात पंतप्रधान मोदी यांनी हरिवंश यांच्या पुढील भूमिकेबाबत संकेत दिले होते. त्यांच्या अनुभवाचा लाभ पुढेही देशाला होईल, असे तेव्हा त्यांनी नमूद केले होते. पत्रकारितेतून सार्वजनिक जीवनात आलेल्या हरिवंश यांनी आपल्या कार्यपद्धतीमुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे. जनता दल (युनायटेड) पक्षाच्या वतीने त्यांनी राज्यसभेत बिहारचे प्रतिनिधित्व केले आहे. 2018 मध्ये ते प्रथमच उपसभापती झाले होते, त्यानंतर 2020 मध्ये त्यांची पुनर्निवड झाली आणि आता तिसर्यांदा त्यांनी हे पद भूषवले आहे. सभागृहातील शिस्त, संतुलित भूमिका आणि सर्वपक्षीय संवाद यामुळे हरिवंश यांच्या कार्यशैलीला मान्यता मिळाल्याचे या निवडीमधून स्पष्ट झाले आहे.

COMMENTS