संगमनेर : दुधाची शुद्धता आणि गुणवत्ता जपल्यामुळेच 'राजहंस' ब्रँडने राज्यभरात मोठे नाव कमावले आहे. दूध संघाचा विजेवरील वाढता खर्च कमी करण्यासाठी ट

संगमनेर : दुधाची शुद्धता आणि गुणवत्ता जपल्यामुळेच ‘राजहंस’ ब्रँडने राज्यभरात मोठे नाव कमावले आहे. दूध संघाचा विजेवरील वाढता खर्च कमी करण्यासाठी टाटा कंपनीच्या समन्वयातून उभारलेला हा सौरऊर्जा प्रकल्प अत्यंत कौतुकास्पद असून, या माध्यमातून दररोज १३५० किलोवॅट वीज निर्मिती होणार आहे, असे प्रतिपादन दूध संघाचे मार्गदर्शक तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघात (राजहंस दूध संघ) सौरऊर्जा प्रकल्पाच्या शुभारंभ सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख हे होते. तर व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, लक्ष्मणराव कुटे, आर. बी. राहणे, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, कन्सल्टंट विनीत शहा, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, सौर ऊर्जा प्रकल्पाचे हर्षल सातव आणि सिद्धार्थ थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, दूध संघाने अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला असून पुढील अडीच वर्षांत या प्रकल्पाचा खर्च वसूल होईल. विजेवरील खर्चात मोठी बचत झाल्यामुळे याचा थेट फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी सांगितले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तीवर आणि लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. सुमारे अडीच एकर परिसरात उभारण्यात आलेल्या या सौरऊर्जा प्रकल्पातून दररोज १३५० किलोवॅट म्हणजेच प्रतिदिन ५,२२० युनिट वीज तयार होणार आहे. याद्वारे महिन्याला तब्बल दीड लाख युनिट वीज निर्मिती होईल. पुढील तीन वर्षांत प्रकल्पाचा पूर्ण खर्च निघणार असून, त्यानंतर दूध संघाला १०० टक्के मोफत वीज मिळणार आहे.

COMMENTS